प्रतिनिधी /बेळगाव
श्रीनगर परिसरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. तसेच डेनेजवाहिन्या आणि जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पण जलवाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती व्यवस्थित करण्यात आली नसल्याने रस्त्यावर धुळीचे साम्राज्य व चिखल निर्माण होत असल्याने वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्मार्ट रस्ते बनवून नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्याचा प्रयत्न चालविला जात असतानाच श्रीनगर परिसरात मात्र नागरिकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिसरात विविध वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आली.
पण वाहिन्या घातल्यानंतर रस्त्याची दुरूस्ती व्यवस्थित करण्यात आली नाही. खोदण्यात आलेल्या चरीची माती तसेच रस्त्यावर साचलेले मातीचे ढिगारे वाहनधारकांसाठी अडचणीचे ठरत आहेत. या मातीवरून ये-जा करताना वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. तर काही ठिकाणी धूळ उडत असल्याने वाहनधारकांचे डोळे खराब होण्याची वेळ आली आहे. वाहिन्या घातल्यानंतर तातडीने दुरूस्ती करण्यात यावी, अशी सूचना सातत्याने केली जाते. पण याकडे दुर्लक्ष होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून, काही ठिकाणी वाहने घसरून पडत आहेत. अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने रस्त्याची दुरूस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.