सध्याचे उपचार योग्य दिशेने : दिल्लीतील तज्ञ डॉक्टर्स-तंत्रज्ञांच्या पथकाचे मत : पंतप्रधान मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री कायम संपर्कात
प्रतिनिधी / पणजी
केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ नाईक यांची प्रकृती काल सोमवारी दुपारी अचानक गंभीर बनली. त्यामुळे दिल्लीतील संरक्षण मंत्रालयाचे हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटलातील तज्ञ डॉक्टर्स व तंत्रज्ञ मिळून दहाजणांचे पथक रात्री गोव्यात दाखल झाले. त्यांनी श्रीपादभाऊंची सविस्तर तपासणी केल्यानंतर ते उपचारांना योग्य साथ देत असून उपचारही योग्य दिशेने सुरु असल्याचे दिसून आले. त्यांची प्रकृती चांगली असून त्यांना दिल्लीत नेण्याची गरज नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. रात्रभर श्रीपादभाऊ या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली राहणार आहेत.
गेले काही दिवस दोनापावला येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपादभाऊ यांची काल सोमवारी दुपारी प्रकृती बिघडल्याने दिल्लीत संपर्क साधण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही श्रीपादभाऊंच्या उपचरांसंदर्भात गोव्यात संपर्क केला. राज्य व केंद्र सरकार यांच्यात चर्चा झाल्यानंतर दिल्लीतील तज्ञ डॉक्टर्सच्या पथकाला तातडीने पाचारण करण्याचे ठरविण्यात आले. पथक आल्यानंतरच नाईक यांना दिल्लीला स्थलांतरीत करायचे की गोव्यातच उपचार चालू ठेवायचे, याबाबत निर्णय घेण्याचेही ठरविण्यात आले.
दिल्लीहून डॉक्टर्स, तंत्रज्ञांचे पथक दाखल
दरम्यान श्ऱीपादभाऊंची ऑक्सिजनची पातळी कमी झाली म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दिल्लीहून खास विमानाद्वारे रात्री गोव्यात दाखल झालेल्या खास आरोग्य पथकात संरक्षण मंत्रालयाचे हॉस्पिटल आणि एम्स हॉस्पिटलाचे मिळून 10 जणांचा समावेश आहे. त्यामध्ये 5 तज्ञ डॉक्टर्स तर 5 तंत्रज्ञांचा समावेश आहे. हे पथक ज्या खास विमानाने दाखल झाले, त्याच विमानाने गरज पडली तर नाईक यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्याचीही सुसज्जता आहे.
सुरु असलेले उपचार योग्य दिशेने : तज्ञ पथकाचे मत
रात्री उशिरापर्यंत तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने श्रीपादभाऊंच्या प्रकृतीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. त्यानुसार श्रीपादभाऊंची प्रकृती चांगली सुधारली आहे. दिल्लीत नेण्याची गरज नाही. एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार सध्या सुरु असलेले उपचार योग्य आहेत. केवळ त्यांच्या फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. सर्व डॉक्टर्स व तंत्रज्ञ रात्रभर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रात्रीही मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून विचारपूस केली. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी कळविले आहे.
गणेश चतुर्थीपूर्वी काही दिवस अगोदर कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर आणि कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर श्रीपादभाऊंनी प्रथम स्वतःला घरात क्वॉरंटाईन करून घेतले होते. तथापि नंतर दोन दिवसांत ताप आल्यामुळे आणि प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना उपचारासाठी मणिपाल हॉस्पिटल-दोनापावला येथे दाखल करण्यात आले. तेथील व गोमेकॉचे डॉक्टर्स त्यांच्यावर देखरेख ठेवून होते. प्रकृती बिघडल्याने त्यांना चांगले उपचार मिळावेत म्हणून दिल्लीच्या एम्सचे दोन तज्ञ डॉक्टर तातडीने आले आणि त्यांनी नाईक यांची तपासणी करून प्रकृतीचा आढावा घेतला. त्याबाबत समाधान व्यक्त करून ते दिल्लीला रवाना झाले. त्यानंतर श्रीपादभाऊंच्या तब्येतीत सुधारणा झाली. मात्र काल सोमवारी ती पुन्हा बिडल्याने राज्यभरात चिंता निर्माण झाली होती.
दिल्लीहून आलेले तज्ञ डॉक्टरांचे पथक रात्रभर श्रीपादभाऊंच्या प्रकृतीचे निरीक्षण करणार आहेत.