ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा बड्या मराठा नेत्यांवर आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
मराठा आरक्षणावरुन राज्यात केवळ राजकारण सुरु आहे. ज्या घराण्यांनी आजपर्यंत सत्ता भोगली, त्या मराठा नेत्यांची आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची इच्छा नाही. त्यामुळे हे श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांना जगू देणार नाहीत. असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारमध्ये निर्णय कोण घेतयं, हे समजत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नेमके मुख्यमंत्री कोण आहेत? हे जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ते मंगळवारी कोल्हापुरात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, यावर आम्ही आजही ठाम आहोत. मात्र या प्रश्नावर मराठा नेतेच राजकारण करत आहेत. राज्याची सत्ता उपभोगून मोठे झालेल्या मराठा नेत्यांना गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचे काहीही देणेघणे नाही. हा प्रश्न जितका लांबवता येईल, तितका लांबवला जात आहे. असा आरोप करीत प्रकरण न्यायालयात प्रलंबित असले, तरी जाहीर केलेल्या योजनांचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
घरगुती वीज बिल माफ करा
महाविकास आघाडीवरही त्यांनी सडकून टिका केली ते म्हणाले, महाविकास आघाडीत गोंधळ सुरु आहे. मुख्यमंत्री कोण हेच त्यांना अजून कळत नाही. घरगुती वीज बिल माफ करण्यास सरकारला अडचण काय आहे. केवळ अडीच हजार कोटींची गरज आहे. सरकारने तात्काळ घोषणा करावी, अशी मागणी केली. यापूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ठरावी वर्गाचेच मतदार होते. त्यामुळे निवडणूक एकतर्फी होत होती. आता परिस्थिती बदललेली आहे. बहुजन समाजातील मुलं शिकली आहेत, त्यांच्यात जागृतता आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार यशस्वी होतील, असा दावा केला. यावेळी पदवीधरमधील उमेदवार प्रा. सोमनाथ साळुंखे, शिक्षक मतदार संघातील उमेदवार प्रा. सम्राट शिंदे उपस्थित होत.