वैदिक ग्रंथानुसार संपूर्ण सृष्टीची निर्मिती भगवान श्रीकृष्णांनी केली आणि त्यानंतर त्याची व्यवस्थापन प्रक्रिया देवदेवतांना सेवा म्हणून दिली. आपण पाहतो की सूर्यदेवता आपल्याला प्रकाश आणि उष्णता देते. पृथ्वी आपल्याला अन्न, खनिजे इत्यादी पुरवठा करते. वरुण व इंद्रदेवता आपल्याला पावसाच्या रूपाने पाणी पुरवठा करतात. वायूदेवता आपल्याला जीवनावश्यक हवा पुरवते. अशाप्रकारे संपूर्ण सृष्टी भगवंताच्या अध्यक्षतेखाली सर्व देवदेवता चालवितात. सृष्टीमध्ये अनेक ब्रह्मांडे आहेत. त्यातील एका ब्रह्मांडामध्ये आपण स्थित आहोत, प्रत्येक ब्रम्हांडाची रचना भगवान कृष्णाच्या निर्देशाखाली ब्रह्मदेव करतात, विष्णू त्याचे संगोपन करतात आणि शिवजी त्याचा ऱहास आणि शेवट करतात. देवतासहित आध्यात्मिकदृष्टय़ा आपण सर्वजण जरी भगवान कृष्णाशी समान असलो तरी कार्य आणि अधिकारदृष्टय़ा आपण वेगवेगळे आहोत. ज्याप्रमाणे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे जरी देशाचे नागरिक असले तरी अधिकार आणि कार्याच्या दृष्टीने ते सर्वश्रे÷ आहेत. श्रीकृष्ण हे 64 गुणाने परिपूर्ण आहेत, राम आदी अवतार 60 गुण धारण करतात, शंकर 55 गुण धारण करतात आणि ब्रह्मदेवता या भौतिक सृष्टीमध्ये जास्तीत जास्त 50 गुण धारण करतात. आपण मनुष्य जास्तीत जास्त 36 गुण धारण करतो, म्हणून लग्नाच्या वेळेला हे गुण वधूवरांमध्ये जमवण्याचा
प्रयत्न असतो.
या संपूर्ण सृष्टीमध्ये शिवशंकराचे एक विशेष स्थान आहे. सूर्यापासून ज्याप्रमाणे त्याचा प्रकाश वेगळा केला जाऊ शकत नाही, त्याप्रमाणे वैदिक ग्रंथातून भगवान शंकरांना वेगळे केले जाऊ शकत नाही. ब्रह्मसंहितेनुसार श्रीकृष्ण आणि महादेव यांच्यातील एकत्व आणि भिन्नता एका सरळसोप्या उदाहरणाने प्रस्तुत केली आहे. ज्याप्रमाणे दुधात विरजण मिसळल्याने त्याचे दही बनते, त्यामुळे एका दृष्टीने दही हे दुधापासून बनले असले तरी ते दूध नाही. त्याचप्रमाणे भौतिकसृष्टीच्या संहाराच्या उद्देशाने भगवान कृष्ण महादेव शंभू बनतात. तात्पर्य असे की महादेव हे भगवान विष्णूच आहेत, परंतु ते त्यांच्याहून भिन्नही आहेत परंतु ज्याप्रमाणे दही दुधापासून तयार होते त्याप्रमाणे शंकराचे मूळ स्रोत भगवान श्रीकृष्णच आहेत. म्हणूनच गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात ‘रुद्रामध्ये मी शंकर आहे.’ या विशेष कारणामुळेच त्यांना देवांचाही देव महादेव म्हणूनही संबोधले जाते. त्याचप्रमाणे शिवजी हे शुद्ध भक्तीच्या स्तरावर भगवान श्रीकृष्णाचे परम भक्त मानले जातात, श्रीमद् भागवतमध्ये वर्णन येते, ‘ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा सर्वश्रे÷ आहे, देवांमध्ये भगवान अच्युत सर्वश्रे÷ आहेत. वैष्णवांमध्ये भगवान शंकर सर्वश्रे÷ आहेत, त्याचप्रमाणे सर्व पुराणांमध्ये श्रीमद भागवत सर्वश्रे÷ आहे’. वास्तविक महादेव भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहेत. त्यासाठी त्यांचा गौरव करण्यासाठी त्यांना विशेष सेवा देतात. ज्यावेळी अमृताच्या लालसेने देवदेवता आणि असुरांनी क्षीरसागराचे मंथन केले, त्यात सर्वप्रथम हलाहल नावाचे विष उत्पन्न झाले. ते विष संपूर्ण विश्वाला नष्ट करणारे होते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांच्या आदेशानुसार सर्व देवता भगवान शंकराला शरण गेल्या. महादेवांनी त्या विषाला आपल्या ओंजळीत एकत्रित करून क्षणार्धात ते विश्वाच्या कल्याणाकरिता प्राशन केले आणि शंकर कायम भगवान श्रीकृष्णाचे नाम कंठी धारण करीत असल्याने ते विष त्यांनी त्या सामर्थ्यावर आपल्या कंठातच रोखून ठेवले. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला, म्हणून ते नीलकंठ नावाने प्रसिद्ध झाले. त्याचप्रमाणे गंगा नदी प्रचंड वेगाने पृथ्वीवर वाहत येत असताना शंकरानीच आपल्या शिरावर तिला धारण करून पृथ्वीतलावर आणले त्यामुळे त्यांचे नाव गंगाधर झाले.
भगवान शंकर हे आपल्या भक्तांना सहजपणे प्रसन्न होतात म्हणून त्यांचे नाव आशुतोष आहे. रावण, बाणासुर, जयद्रथ अशा अनेक भक्तांना त्यांनी वर दिले पण त्याचा दुरुपयोग केल्याने त्यांचा नाश भगवान श्रीकृष्णांनी निरनिराळय़ा रूपाने केला. असे अज्ञानी भक्त त्यांना मिळणाऱया क्षणिक भोगासाठी भगवान शंकराची उपासना करतात. बहुतेक लोक अज्ञानाने काहीतरी भौतिक गोष्टी मागण्यासाठीच देवदेवतांची उपासना करतात. त्यांना हेही कळत नाही की अशा गोष्टी आपल्याला न मागताच प्राप्त होतात त्यासाठी देवीदेवतांकडे जाण्याची काही गरज नाही. त्यांच्याकडे देण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भगवंतप्रेम. स्वतः शिवजी आपली अर्धांगिनी पार्वतीला सांगतात अहं भोगप्रद अस्तु मोक्षदास्तु अर्थात जनार्दन म्हणजे मी या जगातील नाश होणारे भोग देऊ शकतो पण सर्व दुःखातून फक्त भगवान श्रीकृष्णच सर्वाना मुक्त करू शकतात. एकदा पार्वतीने शंकरांना विचारले ‘हे नाथ, आपण नेत्र बंद करून मनामध्ये कायम कोणाचे ध्यान करत असता?’ उत्तरादाखल शंकर म्हणाले ‘हे देवी, भगवान श्रीकृष्ण प्रत्येक जीवांचे स्वामी आहेत. मी त्याच भगवंताच्या प्रमुख विस्तारापैकी एक असूनही मी त्यांच्या मायेने भ्रमित होतो, तर इतर जीवाबाबत काय जे पूर्णपणे मायेद्वारे वशीभूत आहेत. तू विचारलेस मी कोणाचे ध्यान करतो, मी त्या परम भगवान श्रीकृष्णाचे ध्यान करतो जे कालातीत आहेत आणि ज्यांना वेद उपनिषदही समजू शकत नाहीत’.
शिवजी हे भगवान श्रीकृष्णाचे महान भक्त आहेत म्हणून शिव आणि कृष्ण यांना एकमेकांपासून वेगळे त्याचप्रमाणे दोघेही एकच (समान) आहेत असे समजणे हा अपराध आहे. तुकाराम महाराज आपल्याला एका अभंगातून त्याबद्दल वर्णन करताना सांगतात-शिव शक्ती आणि सूर्य गणपती । एकचि म्हणती विष्णुसहि ।।1।। हिरा गार दोन्ही मानती समान । राजास भजने वाया जाती ।।2।। अन्य देवतांशी देव म्हणवून । तामस जीवन तमोयोग्या ।।3।। वाया जावयासी केलासे हव्यास । अन्य देवतांस देवपण ।।4।। आपुलिया मुखे सांगतसे धणी । नव्हे माझी वाणी पदरीची ।।4।। धन्य ते वैष्णव हजारी केशव । सात्विक ते जीव मोक्षा योग्य ।।5।। तुका म्हणे मोक्ष नाही कोणापाशी । एका गोविंदांशी शरण व्हा रे ।।5।। अर्थात शिव, शक्ती, सूर्य आणि गणपती ही सर्व विष्णूचीच रूपे आहेत असे काही लोक म्हणतात. परंतु अन्य देवतांची उपासना राजस वृत्तीने करून लोक वाया जातात. ते हिरा आणि गारगोटी एकच मानतात. इतर देवतांना देव समजून तामसी लोक तामसमय जीवन जगतात. अशा रीतीने अन्य देवतांना शरण गेल्याने हा हव्यास वाया गेल्याप्रमाणेच होतो. हे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या मुखाने सांगतात, ही वाणी माझ्या पदरची नाही. म्हणून या केशवाची अनन्य भक्ती करणारे वैष्णव धन्य होत कारण मोक्ष प्राप्त करण्यास योग्य असे हे सात्विक जीव आहेत. मोक्ष हा इतर कोणापाशी नसल्याने तुम्ही एका गोविंदाला शरण जावे आणि गोविंदाला शरण कसे जावे व त्यांच्यावर प्रेम कसे करावे हे शिवजी स्वतःच्या उदाहरणावरून दाखवून देतात. आपण त्यांच्याप्रमाणे श्रीकृष्णाची यथायोग्य वेदिक शास्त्राप्रमाणे भक्ती केली तर महादेव अत्यंत प्रसन्न होतात. अशा प्रकारची भक्ती ही देखील शंकराची भक्ती होय. परंतु आपण शंकरांना श्रीकृष्णापासून वेगळे करून त्यांची पूजा केली तर त्यामुळे भगवान शंकर कधीच प्रसन्न होणार नाहीत आणि श्रीकृष्णही प्रसन्न होणार नाहीत. रावणाच्या उदाहरणावरून हे आपण समजू शकतो.
आपली पत्नी पार्वतीला शंकर एक रहस्य सांगतात, राम रामेती रामेती, रमे रामे मनोरमे । सहस्त्रनाम तत्तुल्यम, रामनाम वरानने ।। अर्थात दिव्य रामनामाचे चिंतन केल्याने माझे मन आणि चेतना राममय होते, इतर कोणत्याही देवतांच्या हजार नामाच्या तुलनेत एक रामनाम सर्वश्रे÷ आहे. (पद्म पुराण) या त्यांच्या दिव्य उपदेशाचा ‘महाशिवरात्री’च्या निमित्ताने सर्वानी विचार करावा.
वृंदावनदास