प्रतिनिधी /काणकोण
पर्तगाळी येथील श्री गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठाधीश श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजींना सर्व धार्मिक उपचार तसेच वेदघोष आणि मंत्रघोषांसहित पर्तगाळी येथील वृंदावन स्थळी समाधीस्थ करण्यात आले. स्वामी महाराजांचे 19 रोजी सकाळी 11.45 वा. महानिर्वाण झाल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करून वृंदावनस्थाचे विधी संपेपर्यंत पहाटेचे पाच वाजले.
कर्नाटकातून आलेले खास आचार्य आणि पुरोहितांच्या वेदघोषात आणि स्वामी महाराजांचे पट्टशिष्य श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या आदेशानुसार मोजक्याच शोकाकुल अनुयायांच्या उपस्थितीत हा धार्मिक विधींचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला. कोरोना महामारीचा विचार करून मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हे विधी पूर्ण करण्याचा आदेश शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांनी दिला होता. सर्व सोपस्कार त्यांच्याच उपस्थितीत आणि त्यांच्या आदेशानुरूप करण्यात आले.
पर्तगाळ मठाचे गोव्यासहित कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात असंख्य अनुयायी असून श्री विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या महानिर्वाणाची खबर मिळताच कर्नाटक तसेच अन्य भागांतून शेकडो अनुयायांनी पर्तगाळी मठात त्यांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. सर्व विधी संपेपर्यंत पर्तगाळी जिवोत्तम मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मठ समितीचे सदस्य पांडुरंग उर्फ भाई नायक, पुत्तू पै आणि अन्य सदस्य या ठिकाणी उपस्थित होते.
श्री विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या आदेशानुसार येत्या 28 जुलैपासून पर्तगाळी मठातच यंदाचे चतुर्मास व्रताचरण आयोजित करण्यात आले होते. मात्र स्वामी महाराजांच्या महानिर्वाणामुळे त्यात बदल होण्याची शक्यता असून चतुर्मासानंतर शिष्यस्वामी श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांचा पट्टाभिषेक सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मठ समितीचे अध्यक्ष धेंपे यांनी दिली. दरम्यान, पर्तगाळी जिवोत्तम मठाधीशांच्या महानिर्वाणामुळे विशेषता सारस्वत समाजाची फार मोठी हानी झाली असल्याचे सांगून काँग्रसेचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मठ समितीचे आवाहन
दरम्यान, 19 रोजी वृंदावनस्थ झालेले प. पू. गुरुवर्य श्रीमद् श्री विद्याधिराजतीर्थ श्रीपाद वडेर स्वामी यांच्या अंतिम दर्शनासाठी पर्तगाळी मठात येऊन परत घरी गेलेल्यांनी 5-7 दिवसांपर्यंत घरांत विलगीकरणात राहावे. कोविड-19 मुळे कोणालाही ताप, सर्दी अशी काही सौम्य लक्षणे दिसून आल्यास दुसऱया कोणाच्याही संपर्कात न येता त्यावर उपचार करून घ्यावेत. जेणेकरून कोविड-19 चा प्रसार रोखण्यात मदत होईल. श्रीमद् श्री विद्याधीशतीर्थ श्रीपाद वडेर स्वामींनी अशी इच्छा व्यक्त केली आहे. समाजबांधवांनी या बिकट कोविड महामारी काळात आपले स्वास्थ्य राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जिवोत्तम मठ समितीने केले आहे.