कोलंबो / वृत्तसंस्था
आर्थिक परिस्थितीशी झुंजणाऱया श्रीलंकेमधील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली आहे. आणीबाणी जाहीर केल्यानंतर आता श्रीलंकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर श्रीलंकेतील राजकीय उलथापालथ तीव्र झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे हे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेऊन राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यांचे संपूर्ण मंत्रिमंडळ एकाचवेळी राजीनामा देऊ शकते, अशीही चर्चा होती. मात्र, पंतप्रधान कार्यालयाने राजीनाम्यासंबंधीचे वृत्त फेटाळून लावले आहे. दरम्यान, रविवारी राजधानी कोलंबोमध्ये सरकारचा विरोध करणाऱया 650 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. आर्थिक संकटाच्या निषेधार्थ संचारबंदी मोडून हे लोक सरकारविरोधात मोर्चा काढत होते.
श्रीलंकेत रविवारी देशभरात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप आणि इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सेवा बंद झाली. इंटरनेट मॉनिटरिंग संस्था नेटब्लॉक्सने ही माहिती दिली. दुसरीकडे जनक्षोभही उसळत चालला असून जीवनावश्यक वस्तू मिळवण्यासाठी लोकांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागत आहे. याचदरम्यान परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी राजधानी कोलंबोत लष्कर आणि पोलिसांचे जवान पहारा देत आहेत. जनक्षोभ अन्यत्र पसरू न देण्यासाठी प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणेची तारेवरची कसरत सुरू आहे.
आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या श्रीलंकेच्या मदतीसाठी भारत पुढे आला आहे. इंधन संकटाशी लढा देत श्रीलंकेला मदत करण्यासाठी भारताने एक तेल टँकर पाठवला होता, जो शनिवारी श्रीलंकेत पोहोचला. यामुळे इंधनाच्या संकटाशी झगडणाऱया लोकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
भारत श्रीलंकेला तांदूळ पाठवणार
इंधनापाठोपाठ भारताने श्रीलंकेला तांदूळ पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. अलीकडेच झालेल्या करारानुसार 40 हजार टन तांदळाचे लोडिंग सुरू करण्यात आले आहे. लवकरच तांदूळ श्रीलंकेत पोहोचेल असे मानले जाते. 2022 मध्ये भारत श्रीलंकेला किमान 3 लाख टन तांदूळ पाठवणार असल्यामुळे देशातील किंमती कमी होऊ शकतात असा दावा केला जात आहे.
दोन दिवसांपूर्वी आणीबाणी जाहीर
श्रीलंकेतील आर्थिक समस्या वाढत असताना राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी आणीबाणीची घोषणा केली होती. देशाच्या सुरक्षेसाठी आणि अत्यावश्यक सेवांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. यानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शनिवारी राजधानी कोलंबोमध्ये लष्कराच्या देखरेखीखाली जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यात आली होती.
श्रीलंकेत 650 जणांना अटक
श्रीलंकेत महगाई आणि टंचाईचा भडका उडालेला असून त्याविरोधात लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याची वेळ आली आहे. या जनक्षोभाला रोखण्यासाठी श्रीलंका सरकारने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे. तसेच देशात 36 तासांसाठी संचारबंदी लादण्यात आली आहे. मात्र या संचारबंदीला न जुमानता सहस्रावधी लोक रस्त्यावर येत आहे. रविवारी 650 हून अधिक जणांना संचारबंदी मोडल्याच्या कारणास्तव अटक करण्यात आली आहे. जनतेच्या या आंदोलनात तेथील विरोधी पक्षही समाविष्ट झाला आहे. विरोधी पक्षाचे नेते सजीथ पेमदासा यांनी कोलंबो येथील स्वातंत्र्य चौकातून एक मोर्चा काढला होता. त्यावर पोलिसांनी लाठीमार करुन जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. प्रेमदासा यांना काहीकाळ ताब्यात घेण्यात आले होते.