ऑनलाईन टीम / कोलंबो :
आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या श्रीलंकेत आणीबाणी सुरू आहे. देशाचा आर्थिक डोलारा कोसळण्याच्या स्थितीत असतानाच मध्यरात्री श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे वगळता संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा दिला. या घटनेमुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता श्रीलंकेकडे लागले आहे.
सभागृह नेते आणि शिक्षण मंत्री दिनेश गुणवर्धने यांनी सांगितलं की, संपूर्ण कॅबिनेट मंत्रिमंडळाने पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मात्र, या सामुहिक राजीनाम्याचे कारण गुणवर्धने यांनी सांगितले नाही.
दरम्यान, श्रीलंकेत सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे यांनीही मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. नमल हे श्रीलंकेचे केंद्रीय क्रीडा मंत्री होते. नमल राजपक्षे यांनी ट्विट केलं की, ”मी राष्ट्राध्यक्षांच्या सचिवांना माझ्या सर्व विभागांचा राजीनामा तत्काळ प्रभावानं कळवला आहे. आशा आहे की ते महामहिम आणि पंतप्रधानांना श्रीलंकेच्या लोकांमध्ये आणि सरकारमध्ये स्थिरता आणण्यासाठी निर्णय घेण्यास मदत करेल. मी माझ्या मतदारांसाठी, माझ्या पक्षासाठी आणि हंबनटोटाच्या जनतेशी वचनबद्ध राहीन.”
श्रीलंकेतील जनता अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करत आहे. गेल्या अनेक आठवडय़ांपासून लोकांना इंधनासाठी, घरगुती गॅससाठी रांगेत उभं राहावं लागत आहे. जीवनावश्यक वस्तुंचा तुटवडा निर्माण झाला आहे. राजकीय स्थैर्य राखण्यासाठी आणि आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी श्रीलंकेत सर्व पक्षीय सरकार स्थापन होण्याची मागणी होत आहे.