नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोलंबो बंदराच्या विकासाचा करार श्रीलंकेने रद्द केला असला तरी त्रिंकोमाली येथे पेट्रोलियम फार्म निर्माण करण्याचा करार कायम आहे, असा खुलासा भारताने केला आहे. हे पेट्रोलियम संकुल संयुक्त प्रकल्पाच्या स्वरूपात विकसीत केले जाईल. 2003 मध्ये हा करार झाला होता. तथापि, त्या देशाच्या एका मंत्र्यांने काही वादग्रस्त विधाने दोन दिवसांपूर्वी केली होती. त्यावरून या करारातून भारताला बाहेर काढले जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. भारताने ही शक्यता फेटाळली असून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होईल, असे प्रतिपादन केले.
काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेने कोलंबो बंदरविकासाचा प्रकल्प भारताकडून काढून घेऊन चीनला देण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, या बंदराच्या इतर भागांचा विकास करण्याचा भारताबरोबरचा करार अबाधित आहे, असेही स्पष्ट केले होते. त्यामुळे श्रीलंकेच्या धोरणाविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
पेट्रोलियम प्रकल्पाचा हेतू श्रीलंकेत पेट्रोलियमचे साठे करण्याचा आहे. यासाठी मोठय़ा आणि सुरक्षित तेलटाक्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी तेलटाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. या तेलटाक्या भारताकडून पुन्हा विकत घेतल्याचे (बाय बॅक) विधान या देशाच्या एका मंत्र्याने केल्याने संशय निर्माण झाला होता.
संघटनांचा विरोध
श्रीलंकेतील राष्ट्रवादी संघटना, बुद्ध धर्मियांच्या संघटना आणि इतर संस्थांनी भारताशी केलेल्या कराराला विरोध केला. त्यांनी करार रद्द करण्यासाठी दबाव आणला. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असेही या मंत्र्याने म्हटल्याने भारताने चौकशी केली. तथापि करार कायम असल्याचे आढळून आले.