@ प्रतिनिधी/ बेळगाव
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱया श्री कपिलेश्वर देवस्थानचा कायापालट करण्यास सुरुवात झाली आहे. विविध प्रकारच्या धार्मिक विधींबरोबरच सामाजिक कार्याला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने सुरुवात केली. कोरोनामुळे मंदिर बंद करावे लागले. मात्र विश्वस्त मंडळाने या बंद काळात डायलेसिस रुग्णांना आणि गर्भवती महिलांना दवाखान्याला पाठविण्यासाठी जे कार्य केले ते कौतुकास्पद आहे. याबद्दल या विश्वस्त मंडळाचे अभिनंदन होत आहे.
नवीन कार्यकारिणीची स्थापना 1 जुलै 2018 ला झाली. तेथूनच या मंदिराला एक नवीन स्वरूप देण्यास सुरुवात झाली. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली. विश्वस्त मंडळाने मंदिराचा विकास करण्याबाबत जाहीर करताच दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आणि तब्बल दीड कोटी रुपये खर्च करून सभागृह, ध्यानमंदिर तयार करण्यात आले. त्याचा आता भक्तांना मोठा फायदा होऊ लागला आहे.
आठवडय़ातील प्रत्येक दिवशी वेगवेगळय़ा पूजा केल्या जात आहेत. सोमवारी भक्तांसाठी 7 ते 9 यावेळेत प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या मंदिरामध्ये कालसर्पचा विधी केला जात आहे. कालसर्प शांती विधी करण्यासाठी भक्तांना दूरवर जावे लागत होते. यासाठी मोठा खर्च आणि वेळ वाया जात होता. मात्र या मंदिरातच अत्यंत विधिवत चिक्कमंगळूरच्या स्वामींच्या उपस्थितीत हा कालसर्प विधी केला जात आहे. त्याला मोठा प्रतिसादही भक्तांकडून मिळत आहे.
सकाळी 6 वाजता नित्यनियमाने मंदिरामध्ये रुद्रपूजा होत आहे. दररोज अग्निहोत्र सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात केले जातात. पूर्ण शिवचरित्रातील जीवनावर आधारित प्रसंगाचे शिल्प या ठिकाणी तयार करण्यात आले आहे. आता अजूनही मंदिराचा विकास करायचा आहे. पहिल्या मजल्यावर गुरुकुल बांधण्यात येणार आहे. त्याठिकाणी हिंदू धर्माची उत्पत्ती कशी झाली, आपले गोत्र, नक्षत्र आणि योग हे देखील जाणून घेण्यात येणार आहे. याचबरोबर संस्कृत पठण केले जाणार आहे. दुसरा मजला भक्त निवास म्हणून बांधण्यात येणार आहे. याचबरोबर शेवटच्या मजल्यावर बेलापासून मधुमेहींसाठी आयुर्वेदिक औषध निर्मिती करण्याचा मानस विश्वस्त मंडळाने सांगितला.
या मंदिरामध्ये श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी विशेष पूजा-अर्चा केली जाते. याचबराब्sार इतर दिवशीही विविध पूजा-अर्चा केल्या जात आहेत. या मंदिर परिसरात 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अलीकडे दुर्मीळ योग म्हणजे या पिंडीवर सूर्यकिरण पडत आहेत. मार्च महिन्यामध्ये हा योग भक्तांना पाहता आला. लॉकडाऊन काळात डायलेसिस तसेच इतर रुग्णांना दवाखान्याला पोहोचविण्याचे काम करण्यात आले. त्याला जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे सहकार्य लाभल्याचे विश्वस्त मंडळाने सांगितले आहे.
या मंदिराच्या विकासासाठी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष सुनील बाळेकुंद्री, उपाध्यक्ष सतीश निलजकर, सेपेटरी राकेश कलघटगी, जॉईंट सेपेटरी राजू भातकांडे, खजिनदार दौलत साळुंखे, अभिजित चव्हाण, राहुल कुरणे, अजित जाधव, ऍड. अभय लगाडे, अविनाश खन्नुकर, अनिल मुतगेकर, विवेक पाटील, प्रसाद बाचोळकर नेहमीच कार्यरत आहेत.