प्रतिनिधी / कुरुंदवाड
गेल्या चोवीस तासात राधानगरी, कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह शिरोळ तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे तालुक्यातील कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत तब्बल 15 फुटाने वाढ झाल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान या मोसमातील तिसरा मात्र अवेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये बऱ्याच कालावधीनंतर दक्षिणद्वार सोहळा पार पडला. पाण्याची पातळी वाढल्याने तालुक्यातील शिरोळ तेरवाड राजापूर बंधारा पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पडलेल्या पावसामुळे कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने बुधवारी रात्री उशिरा पुराचे पाणी नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरापर्यंत येऊन ठेपले होते, दरम्यान गुरुवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास पुराचे पाणी मंदिराच्या उत्तर बाजूच्या दारातून श्रींच्या पादुकांवरून जाऊन दक्षिण द्वारातून बाहेर पडले. यावेळी या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा पार पडला. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिणद्वार सोहळा होण्याची ही बऱ्याच कालावधीनंतरची पहिली वेळ आहे. असे असले तरी सध्या मंदिर दर्शनासाठी बंद असल्यामुळे भाविकांना व ग्रामस्थांना दक्षिणद्वार सोहळ्याच्या पवित्र स्नानाचा लाभ घेता आला नाही.
दरम्यान दत्त मंदिरात पाणी आल्याने तेथील सर्व साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून श्रींची उत्सवमूर्ती मुख्य मंदिराच्या वरील बाजूस असणाऱ्या श्री नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आली आहे. येथेच सर्व पूजा अर्च व नित्य कार्यक्रम पार पडत आहेत.
दरम्यान पाण्याची पातळी झपाट्याने वाढली असल्यामुळे नदीकाठच्या शेतात पाणी गेल्याने गवताची कुरणे तसेच व शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील कुरुंदवाड शिरोळ जुन्या
मार्गावरील अनवडी पुलावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील शिरोळ, तेरवाड, राजापूर बंधारे पाण्याखाली गेल्याने या बंधार्यावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. तेरवाड बंधाऱ्यावर पाणी आल्याने शिरढोण-तेरवाड मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. तर राजापूर बंधाऱ्यावर पाणी आल्याने कर्नाटकला जाणारा जवळचा मार्ग बंद झाला आहे. शिरोळ बंधाऱ्यावर पाणी आल्याने जुना कुरुंदवाड-शिरोळ मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे.
गुरुवारी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली असली, तरी राधानगरी धरणातून 4256 क्यूसेक्स व कोयना धरणातून 34,211 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होतच आहे.
अधिक महिना, गुरुवार.. दक्षिणद्वार दुग्धशर्करा योग..!
जून ते सप्टेंबर अखेर पावसाळ्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पाणीपातळी वाढली तर दक्षिणद्वार सोहळा होतो. मात्र यावर्षी आलेला अधिक महिना ( पुरुषोत्तम मास) आणि त्यातच अधिक महिन्याचा शेवटचा दिवस, गुरुवार व अवेळी पावसामुळे झालेला दक्षिणद्वार असा दुर्मिळ योग अनेक वर्षानंतर प्रथमच आल्याने हा दुग्धशर्करा योग मानला जातो. मात्र सध्याच्या कोरोना महामारीमुळे येथील दत्त मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने भाविकांना या दुर्मिळ योगावर झालेल्या दक्षिणद्वार सोहळ्याच्या पवित्र स्थानाचा लाभ घेता आला नाही. या दुर्मिळ योगावर झालेल्या दक्षिण द्वाराच्या पवित्र स्नानाचा लाभ न घेता आल्याने अनेकांच्या मनात हुरहूर लागून राहिली आहे.
गेल्या दोन दिवसापासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरातील द्राक्ष बाग, भुईमूग, पालेभाज्या, फळभाज्या तसेच ऊस शेती, सोयाबीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छाटणीला आलेल्या द्राक्षबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर जोरदार पाऊस व वाऱ्यामुळे खिद्रापूर, आकिवाट परिसरातील केळीच्या बागाही जमीनदोस्त झाल्या आहेत. याचा परिणाम म्हणून बाजार पेठेमध्ये सर्वच भाज्यांची आवक कमी झाली असून दर कडाडले आहेत. नदीकाठची गवताची कुरणे पाण्याखाली गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.