रवींद्र केसरकर / कुरुंदवाड
आस थांबली श्रीगुरु चरण दर्शनाची… ! मी कृतार्थ या जीवनी.. अशी भावना तब्बल आठ महिन्यानंतर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक दत्तभक्तांची होती असे म्हटले तर वावगे ठरू नये. दिवाळीच्या पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रींची इच्छा… ! म्हणून मंदिर उघडण्यास परवानगी दिली आणि दररोज दर गुरुवारी पौर्णिमा शनिवार आधी निमित्ताने दत्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला आहे.
श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या तपास साधनेने पावन झालेल्या श्री दत्ताची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत महाराजांनी भक्तांच्या मनातील मनोकामना पूर्ण करण्यासाठी अश्विन शुद्ध द्वादशी अर्थात गुरुद्वादशी ला मनोहर पादुकांची स्थापना केली. येथील श्री चरणाच्या दर्शनाने अलौकिक ऊर्जा तसेच मनोकामना इच्छा पूर्ण होतात अशी धारणा व भावना आणि श्रद्धा लाखो भक्तांची आहे यामुळेच हे स्थान जागृत मानले जाते. मात्र गेल्या आठ महिन्यापासून कोरोना महामारी च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री चंरण दर्शन बंद होते यामुळे लाखो भाविक नाराज झाले होते.
अखेर श्रींची इच्छा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याची परवानगी दिली आणि येथील रहिवाशांना सह दत्त भक्तांचा आनंद गगनात मावेना, ‘दत्त दर्शनाला जायचं जायाचं आनंद पोटात माझ्या मावना ‘ ‘वाट वळणाची जीवाला या ओढी, दिसते समोर नरसोबाची वाडी’ अशीच काही भावना येथे येणाऱ्या प्रत्येक दत्त भक्ताच्या मनात दिसत होती.
येथील दत्त देव संस्थान शासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे पालन करीत सॅनिटायझर, थर्मल टेस्टिंग, सोशल डिस्टंसिंग, मास्क सक्ती. या नियमांचे पालन करत पाडव्याच्या मुहूर्तावर पहाटे चार वाजता मंदिर दर्शनासाठी खुले केले. मंदिर खुले होणार याची वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने दत्त चरण च्या दर्शनासाठी आसुसलेले भक्त पहाटेच्या आधीपासूनच मंदिर परिसरात उपस्थित होते. श्री चरणाचे दर्शन घेतले आणि श्री चरणाच्या दर्शनाची आस थांबली अशीच भावना येथील प्रत्येकाने व्यक्त केली.
श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पाडव्याच्या मुहूर्तावर येथील पुजारी मंडळी कृष्णेत पवित्र स्नान करून श्रींच्या चरणकमलावर जल अभिषेक करतात अशी गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे मात्र मंदिर बंदमुळे ही परंपरा खंडित पावते की काय अशी परिस्थिती होती. पण पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर खुले झाल्याने श्रींच्या चरणस्पर्श बरोबर जलाभिषेक करायला मिळाल्याने सर्व पुजारी मंडळींच्या चेहऱ्यावर एक आत्मिक आनंद दिसत होता.
20 मार्च पासून येथील प्रसिद्ध मिठाई व्यापारी पेठ बंद होती. ऑक्टोबर पासून ती हळू हळू सुरू झाले होती. मात्र मंदिर बंद असल्याने व्यापारात मंदी होती. पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर दर्शनासाठी खुले झाल्याने व्यापाऱ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. तर सर्व दुकाने भाविकांच्या स्वागतासाठी पूजा साहित्यासह प्रसिद्ध मिठाई भंडार भरगच्च भरून सज्ज झाले होती. आता मंदिर खुले झाल्याने आपला व्यापार होऊन अर्थ चक्र पुन्हा सुरू होईल अशी आशा येथील व्यापारी मंडळींना आहे.