प्रतिनिधी/ म्हापसा
खोर्ली म्हापसा येथील उसापकर हॉटेलजवळील रस्ता दुऊस्तीसाठी पूर्णत: खोदण्यात आला आहे. येत्या 25 जानेवारीला खोर्ली म्हापसा येथील वार्षिक श्री गणेश जयंती प्रित्यर्थ वार्षिक पालखी या रस्त्यातून जाते. मात्र यंदा हा रस्ता खोदल्याने या भागातून पालखी नेताना बराच त्रास होणार आहे. गणेश जयंती झाल्यावर हा रस्ता खोदा असे आम्ही पालिकेला स्पष्ट केले होते मात्र आमचे म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही. येत्या 25 रोजी पालखी दिवशी येथील रस्ता मातीने भराव घालून पालखीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी खोर्ली म्हापसा येथील श्री गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग वराडकर यांनी खोदकाम ठिकाणी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
आम्ही पालखी याच वाटेने नेणार
यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे तसेच अनिल केरकर उपस्थित होते. याबाबत अधिक माहिती देताना वराडकर म्हणाले की, अनेक वर्षांपासून गणेश जयंतीची पालखी असापकर हॉटेलला वळसा घालून खोर्ली मार्गे प्रयाण करते मात्र यंदा हा मुख्य रस्ता मधोमध फोडून येथे ये-जा करण्यास बंद करण्यात आला आहे. याबाबत पालिकेला कळवूनही आमची काहीच दखल घेण्यात आली नाही. मात्र आम्ही आमची वार्षिक पालखी याच वाटेने नेणार असून पालिकेने त्या दिवशी तो रस्ता बुजवून द्यावा अशी मागणी वराडकर यांनी केली. या दिवशी हजारो लोक येथे येतात. रस्ता खोदल्याने सध्या मंदिरासमोरून वाहने वळविण्यात येत आहेत ती उत्सवादिवशी बंद करणार आहोत, असे वराडकर म्हणाले.
पाटी लावण्यासाठी येथे कुणाला घाईगडबड झाली- संजय बर्डे
श्री बोडगेश्वर शेतकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे म्हणाले, दरवर्षी खोर्ली सार्वजनिक गणेशोत्सवाची गणेश जयंती साजरी केली जाते. पालिकेला सांगूनही त्यांनी मुद्दामहून देवस्थानची पालखी प्रदक्षिणा जाणारा रस्ता खोदला आहे. या खोदकामामुळे कॉलेज विद्यार्थी, भाविक, नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. नगरपालिकेचा हा मनमानी कारभार चालू आहे मात्र आम्ही देखील प्रदक्षिणाची पालखी याच रस्त्याने नेणार आहोत. त्यामुळे येथे प्लॅटफोर्म घालून द्या, असे बर्डे म्हणाले.
पर्यटक मधोमध अकडून पडतात खोर्ली म्हापसा येथील रहिवासी अनिल केरकर म्हणाले की, हा रस्ता अर्धा अर्धा फोडायला पाहिजे होता जेणेकरून दुचाकी येथून ये-जा करू शकल्या असत्या. हा मुख्य रस्ता आहे. आता येथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक ब्लॉक होते. डायव्हर्जनबाबत योग्य माहिती दिली नाही. पर्यटक आतमध्ये येऊन अडकून पडतात. सरकारने यावर योग्य तोडगा काढावा व आमची देवाची पालखी नेण्यास सहकार्य करावे असे केरकर म्हणाले.