प्रतिनिधी/ बेळगाव
श्री बसवेश्वर मल्टिपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीने ठेवीदारांना ठेवी परत केल्या नाहीत. त्यामुळे ठेवीदार संकटात आले असून तातडीने त्या सोसायटीवर कारवाई करून ठेवीदारांच्या ठेवी परत द्याव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी जिल्हाधिकाऱयांनी निवेदनाद्वारे केली आहे.
चिकोडी येथे श्री बसवेश्वर मल्टिपर्पज सौहार्द सोसायटीची मुख्य शाखा आहे. बेळगाव शहर व परिसरात त्यांच्या शाखा असून सर्वसामान्य जनतेच्या 100 हून अधिक कोटींच्या ठेवी आहेत. त्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ सुरू आहे. मनोहर सिद्धाप्पा करजिन्नी यांनी 50 लाख रुपये ठेव ठेवली होती. ती ठेव परत देण्यास टाळाटाळ करत आहेत. जिल्हाधिकाऱयांनी याबाबत सखोल चौकशी करून सोसायटीचे चेअरमन राजनगौडा रावसाहेब पाटील आणि संचालकांची संपूर्ण मालमत्ता जप्त करून ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळवून द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी मनोहर करजिन्नी, ऍड. एन. आर. लातूर, बी. सी. कापसे, सुभाष बागेवाडी, अनिल चिनगुडी, ऍड. रोहित लातूर, ऍड. यशवंत लमाणी यांच्यासह ठेवीदार उपस्थित होते.