भजन करत जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा : धारकऱयांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणा
प्रतिनिधी /बेळगाव
मी पांडुरंगाचा, पांडुरंग माझा असा भाव वारकऱयांच्या मनामध्ये रुजला गेला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे देहू-आळंदी ते पंढरपूर अशी आषाढी वारी निघते. मोठय़ा भक्तिभावाने आणि उत्साहाने वारकरी यामध्ये सामील होतात. सध्या कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. त्यामुळे या वारीला सर्वांनाच मुभा देणे गरजेचे होते. मात्र, ते अमान्य करून त्यावर निर्बंध घालणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्याला विरोध केला म्हणून बंडातात्या कराडकर यांना फलटण येथे स्थानबद्ध केले. त्या विरोधात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी व धारकऱयांनी विरोध केला म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि वारीमध्ये सहभागी होण्यास कर्नाटकातील वारकऱयांना मुभा द्यावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नेतृत्वाखाली वारकऱयांनी भजन करतच जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. तत्पूर्वी कित्तूर चन्नम्मा चौक येथील गणपती मंदिरमध्ये नामदेव पिसेंच्या नेतृत्वाखाली आरती झाली तर किरण गावडे यांनी ध्वज चढविला. त्यानंतर पेरणामंत्र व महाआरती झाली. आध्यात्मिक अशा आळंदी ते पंढरपूर आणि देहू ते पंढरपूर अशा पायी वारी करणारे महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, गोवा आणि इतर राज्यांमधून लाखेंच्या संख्येने वारकरी येत असतात. शेकडो वर्षांची ही परंपरा आहे. जात, पात, वर्ण, भाषा विसरून सगळे वारीमध्ये रमून केवळ पांडुरंगाचा धावा केला जातो.
कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने निर्बंध घातले. भोळेपणाचा फायदा घेत त्यांनी वारकऱयांची दिशाभूल केली. बसनेच पादुका पंढरपूरपर्यंत नेण्यात आल्या. ही वारकऱयांची फसवणूक आहे. त्या विरोधात ह.भ.प. बंडय़ातात्या कराडकर यांनी आवाज उठविला. त्यांनी वारकऱयांना पायी दिंडी काढण्याचे आवाहन केले. त्यामुळे फलटण येथे त्यांना स्थानबद्ध करण्यात आले.
याची माहिती संभाजीराव भिडे गुरुजी यांना मिळाली. त्यांनी सरकारच्या त्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला. त्यामुळे भिडे गुरुजी व 80 धारकऱयांवर गुन्हे दाखल केले. त्याचा तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले. वारकऱयांच्या पाठिशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असून आम्हाला वारीला मुभा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष किरण गावडे, अजित जाधव, विश्वनाथ पाटील, किरण बडवाण्णाचे, अंकुश केसरकर, गजानन पाटील, सागर पवार, मल्लेश बडमंजी, महेश जाधव, युवराज पाटील, प्रमोद चौगुले, परशराम पाटील, मंगेश हरेर, प्रसाद बाचोळकर, आनंद चौगुले, रत्नप्रसाद पवार यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.