खासदार उदयनराजे भोसले : शाहुपूरीतील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ
प्रतिनिधी/सातारा
आमच्या महसूल राज्यमंत्री पदाच्या काळात, तत्कालिन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन झाले होते. दरम्यान सत्तापालट झाला. जनतेच्या दुर्दैवाने, श्रेयवादामधून ही योजना चांगली असुनही बस्थानात गुंडाळली गेली. त्यामुळे नागरीक मात्र या योजनेच्या पाण्यापासून सुमारे 20 वर्षे वंचित राहीले याची खंत आणि क्लेश जरुर आहेत. तथापि देर है लेकिन अंधेर नही है याचे समाधान आहे असे उद्गार साविआचे अध्यक्ष आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
शाहुपूरी 27 बाय 7 या योजनेच्या पाणीपुरवठयाची यंत्रणा कळ दाबून कार्यान्वित करताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रसारमाध्यमांशी अनौपचारिक बोलत होते. यावेळी सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील, ?ङ.ङि.जी.बनकर, नगरसेवक वसंत लेवे, बाळासाहेब ढेकणे, तत्कालीन शाहुपूरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, यांचेसह अनेक मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, कण्हेर उद्भव प्रादेशिक पाणीपुरवठा ही भुमिपूजन झालेली याजना मार्गी लागली असती तर केवळ 16 कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कमेमध्ये शाहुपुरी, शिवराज पेट्रोलपंपाच्या पूर्वेकडील वसाहतींसह योजनेतील मार्गावरील एकूण 18 गावांतील 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्येला ग्रॅव्हिटीने पाणी पुरवठा उपलब्ध झाला असता. 1999 नंतर सत्ताबदल झाला. आम्ही आमदार म्हणून राहीलो नाही. अनेक विनंत्या-आर्जव करुन केवळ आम्हाला श्रेय मिळेल या संकुचित हेतूने एक चांगली पाण्याची सुविधा देणारी योजना अडगळीत टाकण्यात आली. आजच्या शाहुपूरी 24 बाय 7 योजनेमधून शाहुपूरी आणि काहीसा करंजेमधील सुमारे 10 हजारपेक्षा जास्त लोकसंख्येच्या भागाकरीता प्रथम 31 कोटी आणि नंतर वाढील अंदाजपत्रकानुसार सुमारे 42 कोटी रुपये मोजावे लागले आहेत. निव्वळ श्रेयवादामुळे हे झालेले सार्वजनिक पैश्याचे दुहेरी नुकसान कुणी काहीही म्हटले तरी निश्चितच कधीही भरुन न येणारे आहे.
श्रेयवादाची मानसिकता कुणाचीही असू नये. नागरिकांना मिळणाऱया मुलभुत सुविधा केंद्रबिंदू ठेवल्या पाहीजेत. आपणाला जमलं तर जरुर करावे. परंतु दुसरा काही करीत असेल तर त्याला एक तर सहाय्य नाही जमले तरी खोडा तरी घालू नये. श्रेयवाद ही संकुचित मानसिकता आहे. राजकारण्यांचा तर व्यापक दृष्टीकोन असलाच पाहीजे. श्रेयवादापासून दूर राहीले पाहीजे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम शेवटी जनतेला भोगावे लागतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून तत्कालीन कण्हेर उद्भव योजनेकडे पाहीले जात असेल.
स्व.दादामहाराज ऊर्फ श्री.छ.प्रतापसिंहमहाराज यांचा हा मार्गदर्शक पायंडा आहे. आज निदान कण्हेरमधून शाहुपूरीकरांना तरी पाणी आणले आहे. या 24 बाय 7 योजनेमधून सुमारे 10 हजार पाणी कनेक्शन्स नगरपरिषदेच्या माध्यमातून दिली जातील. 18 गावांची नाही तरी शाहुपूरीकरांची तरी तहान भागवण्याचा निश्चितच आनंद होत असल्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितले.