वार्ताहर/ माखजन
लहानपणापासून अभिनयावर प्रेम केलं, बी.एसटीतील नोकरी सांभाळून असंख्य नाटय़प्रयोग केले. पण ‘श्व्खाास’ चित्रपटामुळे जीवनाला दिशा मिळाली, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, रंगकर्मी अरुण नलावडे यांनी केले. ते गोळवली येथे ‘कलांगण’च्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित संगमेश्वर संपदेचा अरुणोदय या मुलाखतीत बोलत होते.
संगमेश्वर तालुक्यायील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळावं व रसिकांची सांस्कृतिक भूक भागावी यासाठे गतवर्षी 21 जानेवारीला कलांगण परिवाराची सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. या कलांगण परिवाराच्या चळवळीचा प्रथम वर्धापन दिन नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्त अभिनेते अरुण नलावडे याना मुलाखतीच्या माध्यमातून संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी बोलत केले.
नलावडे पुढे म्हणाले, की सगळीच क्षेत्र चांगली असतात परंतु सातत्य, चिकाटी आणि संघर्ष करण्याची वृत्ती हवी. उत्तम कलाकृती बनण्यासाठी मेहनत आणि जिद्द हवी. अभिनय क्षेत्रात येऊ इच्छिणाऱयांनी प्रथम रंगभूमी करायला हवी, वाहिनीवरील अभिनय मृगजळासारखा आहे. रंगभूमीने शिस्त लागते. ती पुढे उपयोगी येते. यावेळी अरुण नलावडे यांनी ‘श्वास’च्या निर्मितीपासून झालेला संघर्ष ते ‘श्वास’चा सुवर्णकाळ इथपर्यंत संपूर्ण जीवनप्रवास उलगडला. संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अरुण नलावडे यांनी दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी अरुण नलावडे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या काही निवडक पत्रांचे वाचन केले. याला रसिकांचा, टाळ्य़ांचा गजरात उदंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान या कार्यक्रमात संपदा जोगळेकर-कुळकर्णी (फूणगूस), हेमंत भागवत (सरंद), विश्वनाथ कान्हेरे (बुरंबाड), सतिश कामत (राजवाडी), वैभव आणि स्वरुपा सरदेसाई (मोर्डे), निधी पटवर्धन (देवरूख), आनंद बोंद्रे (देवघर-देवरुख ), उदय लोध (देवरूख), प्रथमेश लघाटे (आरवली), अभिजित आणि ऋतुजा हेगशेटय़े (तेर्ये-बुरंबी ), नितीन आणि शिल्पा करकरे (तुरळ), सदानंद भागवत (देवरूख) आदी संगमेश्वर संपदामध्ये वर्षभरात मुलाखत झालेल्या 13 नामवंतांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन कसबा संगमेश्वर येथील निबंध कानिटकर यांनी केले. प्रास्ताविक अमोल लोध यांनी तर आभार निबंध कानिटकर यांनी मानले.