मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे झालेलं नुकसान, मराठा आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर मत मांडले.
यावेळी अजित पवार म्हणाले की, केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेची अवस्था गंभीर आहे. सगळे पत्रकार एकाच सुरात, भाषेत कसं ट्वीट करतात हे पाहिल्यामतर लोकशाही संकटात असलेली भीती निर्माण होते. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.
राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या मातीशी नातं सांगणारा पक्ष आहे, जनतेशी नाळ जुळलेला हा पक्ष आहे. सरकार स्थापन केल्यावर चार महिन्यात करोनाचं संकट आलं. विरोधक वेगवेगळा प्रचार करतात पण सर्वोच्च न्यायालयानं, मुंबई हायकोर्टानं कौतुक केलं आहे. जगात काय चाललंय हे आपण पाहिलं, तसंच देशात यमुना, गंगेच्या तीरावरील दुर्दैवी चित्र आपण पाहिलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणा झाला आहे. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली असल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.