यंदाचा स्वातंत्र्यदिन कोरोना विषाणूच्या जागतिक उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर साजरा होत आहे. अशाच प्रकारे इतिहासात काही
अथवा मानवनिर्मित आपत्तींच्या पार्श्वभूमीवर साजरे करावे लागले आहेत. त्यापैकी काही महत्वाच्या आपत्तींचा आणि स्वातंत्र्यदिनांचा हा आढावा… 1947 : भारताचा प्रथम स्वातंत्र्यदिन फाळणीच्या संकटाने ग्रासला होता. आदल्याच दिवशी पाकिस्तानचे स्वातंत्र्य घोषित झाले होते. तेव्हापासून लगेचच लक्षावधी हिंदू निर्वासितांचे लोंढे भारताकडे धावू लागले होते. फाळणीच्या दिवसांमध्ये लक्षावधी नागरिकांच्या हत्या, महिलांवरील अत्याचार इत्यादी कौर्याने कळस गाठला होता. तशातच तो स्वातंत्र्यदिन साजरा झाला होता.
1948 : दुसरा स्वातंत्र्यदिनही फाळणीमुळे झालेल्या हिंसाचाराच्या सावटाखालीच साजरा झाला. भारतात पाकिस्तानातून आलेल्या कोटय़वधी हिंदू निर्वासित बांधवांच्या वास्तव्याची व्यवस्था करण्याचे आव्हान भारतासमोर होते. हे आव्हान स्वीकारण्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याचीही आवश्यकता होती. कालांतराने स्थलांतरीतांच्या प्रश्नाची तीव्रता कमी झाल्याचे दिसून आले.
1963 : 1962 नोव्हेंबरमध्ये भारताचा चीनबरोबरच्या युद्धात पराभव झाला होता. त्यानंतर साधारणतः 9 महिन्यांनी आलेल्या या स्वातंत्र्यदिनावर त्या पराभवाचे सावट होते. या युद्धाने भारताची प्रतिष्ठाही धोक्यात आणली होती. त्यामुळे नंतरच्या काळात ती सावरण्याचे आव्हान सरकारसमोर होते. चीनी आक्रमणामुळे भारताच्या गटनिरपेक्ष धोरणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
1972 : 1972-1973 या आर्थिक वर्षात दक्षिण भारताच्या मोठय़ा भागात भीषण कोरडा दुष्काळ पडला होता. तर त्याचवेळी उत्तर भारतात काही भागात अतिवृष्टीचे संकट ओढवले होते. या भीषण दुष्काळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. या राज्याच्या जवळपास सर्व तालुक्यांना दुष्काळाचा फटका बसला. या दुष्काळाची चाहूल 1972 मध्येच लागली होती.
2009 : 1972 च्या दुष्काळानंतर देशात सर्वात मोठा दुष्काळ 2009 मध्ये पडल्याचे हवामान विभागाने घोषित केले होते. 37 वर्षांनंतर पुन्हा मोठय़ा दुष्काळाशी दोन हात करावे लागले होते. या दुष्काळाचे सावट देशव्यापी होते. त्याची चाहूल 2009 च्या ऑगस्ट महिन्यात, म्हणजे स्वातंत्र्यदिनाच्या महिन्यातच लागलीं होती. ऑगस्टमध्येच दुष्काळाचे अनुमान केले गेले.
2013 : या वर्षाच्या जूनमध्ये उत्तराखंड राज्यात भीषण ढगफुटीने हाहाकार उडाला होता. शेकडो लोक अतिवृष्टीत वाहून गेल्याने दगावले होते. मृतांची संख्या 5 हजारांहून अधिक होती असेही सांगितले जात होते. त्यामुळे या दुर्घटनेनंतर 2 महिन्यांमध्ये साजरा झालेल्या स्वातंत्र्य दिनावर या ढगफुटीचे सावट होते. या नैसर्गिक आपत्तीतून सावरण्यासाठी किमान 8 महिने लागले होते.