शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरि खोबरेकर यांचा टोला
प्रतिनिधी / मालवण:
तौक्ते चक्रीवादळ होऊन आठ दिवस उलटून गेल्यानंतर काल सोमवारी माजी खासदार नीलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे दिसून येते. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गेले आठ दिवस मतदारसंघ पिंजून काढत नुकसानीची पाहणी केली. नुकसानग्रस्तांना शिवसेनेतर्फे विविध प्रकारची मदत पुरविली. लोकांसोबत राहून त्यांनी मदतकार्य केले, नुकसानीचे पंचनामे करून घेतले. मात्र, राणे या संकटकाळात बंगल्यात बसून आराम करत होते. आमदार नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी का होईना काल राणे मालवणात आल्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो, असा उपहासात्मक टोला शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे.
खोबरेकर म्हणाले, आमदार नाईक यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या व सातत्याने त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला. त्यामुळे नुकसानीचे पंचनामेही पूर्ण करण्यात आले आहेत. विद्युत खांब व वाहिन्यांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. त्यासंदर्भात नाईक यांनी वीज वितरणच्या सातत्याने संपर्कात राहून लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा 90 टक्के सुरळीत झाला आहे. पाठपुरावा करून इतर जिल्हय़ातील वीज वितरणचे कर्मचारीही जिल्हय़ात पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच अन्य मंत्रीही जिल्हय़ात आले आणि त्यांनी पाहणी केली. त्यांनी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, राणे आठ दिवसांनी जागे झाले आणि त्यांना मालवणची आठवण आली. शिवसेनेच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत केली जात असल्याने राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच शिवसेनेवर आरोप करत जनतेची दिशाभूल करून ते आपली करपलेली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आमदार नाईक यांच्या माध्यमातून सुरू असलेले काम जनता बघत आहे. राणे करत असलेल्या टीकेला जनता गांभिर्याने घेत नाही. आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी राणे उठसूट कोणावरही टीका करत असतात. त्यामुळे शिवसेना त्यांच्या टीकेला भीक घालत नाही. ही वेळ राजकारण करण्याची नसून जे यात राजकारण करताहेत त्यांना करू द्या. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू आहे, असे खोबरेकर म्हणाले.