मध्यप्रदेशातील गरीब कल्याण अन्न योजना लाभार्थींशी साधला संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी मध्यप्रदेशातील प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या लाभार्थींशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकांच्या आयुष्यातील समस्या कमी करण्यासाठी देशभरात वीज, पाणी, गॅस या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोरोनामुळे लोकांच्या उपजीविकेवर आलेले संकट दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकाला रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. शेतकरी, श्रमिक, मजूर आणि सर्वसामान्यांच्या अडचणी कमी करण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेबद्दल सर्व नागरिकांना माहिती मिळावी आणि या योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळावा, यासाठी मध्यप्रदेश सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मध्यप्रदेशातील सुमारे पाच कोटी लाभार्थींना या योजनेंतर्गत मोफत धान्य मिळत आहे. या लाभार्थींना शनिवारी पंतप्रधानांनी संबोधित केले. यावेळी मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगूभाई पटेल आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानही उपस्थित होते. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, त्रिपुरा, हरियाणा आणि गोवा या राज्यांच्या अन्न विभागाचे मंत्री आणि संबंधित अधिकारीही यामध्ये सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या संकटात केंद्र सरकार जनतेच्या पाठीशी आहे. हे जागतिक संकट आहे. गेल्या 100 वर्षांतील ही सर्वात मोठी महामारी आहे. या संकटाचा आपण सर्वांनी एकत्रितपणे मुकाबला करण्याची गरज आहे, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.