प्रतिनिधी/ पणजी
गोव्यातील रेती व्यवसायावर जे संकट आले आहे, ते दूर करुन राज्यातील सर्व रेती व्यवसायिक तसेच त्यांच्यावर अवलंबून असणाऱयांचा उदरनिर्वाह योग्यप्रकारे व्हायचा असेल, तर राज्याच्या सर्व भागातील रेती व्यवसायिकांनी सर्व मतभेद विसरुन एकत्र येऊन अखिल गोवा पातळीवर संघटना स्थापन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊया असे ओल्ड गोवा येथील रेती व्यवसायिक तथा समाजकार्यर्ते विशाल वळवईकर यांनी केली आहे.
रेती व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे, मात्र सध्या तो विचित्र अवस्थेत सापडलेला आहे. जे लोक कायदेशीरपणे तसेच पर्यावरणाला जराही धक्का लागू न देता हा व्यवसाय करत आले आहेत, त्यांनाही परवाने दिले जात नाही. त्यामुळे अनेक वर्षे रेती व्यवसायिक आर्थिक संकटात सापडले आहे. जे प्रामाणिकपणे हा व्यवसाय करतात त्यांना सध्या उदरनिर्वाह करण्यासाठी संघर्ष करावा लागत असून आपल्या भवितव्य काय याबाबत ते चिंताग्रस्त आहेत.
सध्याचा काळ आधुनिक असल्याने कोणत्याही समस्येवर तोडगा काढता येतो. रेती काढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती काढली नाही तर अनेक ठिकाणी सँड डय़ून्स म्हणजे वाळूची बेटे तयार होतात. त्याचा त्रास बार्ज व अन्य जलवाहनांना होत असतो. गोव्यात 2000 सालापासून बांधकाम क्षेत्राला चांगले दिवस आल्याने अनेक पदवीधरांनीही नोकरी न मिळाल्याने कर्ज काढून, कुटुंबियांचे दागिने गहाण ठेवून रेती व्यवसायात उडी घेतली होती. मात्र सध्याच्या संकटामुळे रेती व्यवसायिक हवालदिल झाले आहेत, यावर सरकारने आताच उपाययोजना करण्याची गरज आहे, असे वळवईकर म्हणाले.
रेती व्यवसाय भरपूर कष्टांचा अन् प्रसंगी जीघेणाही
रेती व्यवसाय बारा महिने न चालता केवळ आठच महिने चालतो. रेती काढण्याची प्रक्रिया भरपूर कष्टांची तसेच प्रसंगी जीवाशी खेळ करणारीही आहे. रेती व्यवसायिकांना सँड माफिया म्हणणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात त्यांची परिस्थिती काय आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. गोव्यातील अनेक पारंपरिक व्यवसाय बंद पडले जात असून त्यामुळे बेरोजगारी मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. होडय़ा गंजू लागल्या आहेत. कामगार बेरोजगार झाले आहेत. खाणी, रेती, चिरे, खडी हे सर्व व्यवसाय बंद असल्याने त्याचा हजारो कुटुंबांवर परिणाम होत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून याप्रकरणी सरकारने लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.
नियम ठरवा, अटी घाला, परवाने द्या. त्यामुळे सरकारला महसूल मिळेल. हजारोंना रोजगार मिळेल, याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. हे सर्व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्यातील सर्व रेती व्यवसायिकांनी एकत्र येऊन अखिल गोवा स्तरीय संघटना स्थापन करुन हा व्यवसाय पुन्हा उर्जितावस्थेत यावा म्हणून सरकारशी वाटाघाटी करुया, असे आवाहन वळवईकर यांनी केले आहे.