ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
मानवतेची सेवा करणारे बुद्धांचे खरे अनुयायी आहेत. असे म्हणत या संकटाच्या काळात 24 तास कार्यरत असणाऱ्या कोरोना वॉरियर्सचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या पवित्र दिवशी आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त आज जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, बुद्ध केवळ नाव नाही तर एक विचार आहे. भगवान बुद्ध यांनी जगाला कायम दिशा दाखवली. त्यांनी सांगितलेले चार मार्ग दया, करुणा, समभाव, स्वीकार भारतभूमीसाठी प्रेरणादायी आहेत. त्याग, समर्पणाची भावना म्हणजे बुध्द होय.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जनतेत येण्यास आवडले असते पण आजच्या परिस्थितीत ते शक्य नाही आहे. जेव्हा निराशा पसरते, तेव्हा बुद्धांचा विचार प्रासंगीक ठरतो. असं ही ते यावेळी म्हणाले.
संपूर्ण देश कोरोनाशी लढा देत आहे. आपण सर्वांनी एकजूट होऊन लढा दिल्यास या संकटाला तोंड देणे सोपे होईल. आज या संकटात भारत निस्वार्थी भावनेने सर्वांना मदत करत आहे. मग तो देश असो वा परदेेश, या काळात नफा तोटा पाहिला जात नाही.
भारत संपूर्ण जगाच्या पाठीशी उभा आहे. संकट काळात मदत करणे हा आपला धर्म आहे. त्यामुुळे या संकटात शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करा असा सल्ला ही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिला.