प्रतिनिधी/ संकेश्वर :
संकेश्वर येथे गुरुवारी प्रशासनाकडून सीलडाऊनचे निर्बंध अंशतः शिथिल करण्यात आले. त्यामुळे सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत दुकाने उघडण्यात आली. मात्र खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेत फिरकले नसल्याने दुकानदारांना ग्राहकांची वाट पाहतच वेळ मारुन न्यावी लागली.
आमदार उमेश कत्ती यांनी बुधवारी प्रशासनास नागरिकांना भाजीपाला घरपोच द्या व सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत किराणा मालाची दुकाने उघडून ग्राहकांना खरेदी करण्यासाठी अनकुल करा अशी सूचना दिली होती. त्यानुसार प्रशासनाने सीलडाऊनमध्ये ही अंशतः सूट दिली आहे.
संकेश्वर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाकडून खबरदारी म्हणून परिसरात सीलडाऊन केला. शिवाय आतापर्यंतच्या आठ दिवसाच्या काळात 107 जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यापैकी रुग्णाच्या कुटुंबातील 11 जणांचा स्लॅब अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सध्या थोडासा दिलासा मिळाला असून, 27 रोजी येणाऱया दुसऱया चाचणीच्या अहवालाकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. पोलीस प्रशासनाने काटेकोर पहारा दिला असला तरी दुपारपर्यंत बेजबाबदार नागरिकांमुळे किरकोळ वर्दळ दिसून येत आहे.
नव्याने सर्व्हेचे काम सुरू
नुरानी मशीद परिसरातील 2 कि. मी. अंतराचा भाग हायअलर्ट घोषित केल्यामुळे या भागातील प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलन करण्यासाठी गुरुवारी दुसऱया टप्प्यातील सर्व्हेचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले आहे. यामध्ये कोणास आरोग्याची तक्रार असेल तर त्यांच्यावर उपचार करण्याची सूचना करण्यात आली. शिवाय दुपारी 12 वाजल्यानंतर शहर पूर्णपणे सीलडाऊन करण्यात येत असल्याने या कालावधीत खासगी रुग्णालयेही बंद ठेवली जात आहेत. तथापि औषध दुकाने दिवसभर चालू ठेवण्यात आली असून, किरकोळ आजार सध्या गोळय़ांवरच बरा करण्याची मानसिकता नागरिकांतून दिसून येत आहे.