प्रतिनिधी/ संकेश्वर
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अद्याप परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. खबरदारी म्हणून टास्कफोर्स कमिटी स्थापन करुन संपूर्ण शहरातील आरोग्य परिस्थितीचा आढावा घेण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. त्यामुळे संकेश्वरातील 23 वॉर्डात टास्कफोर्स कमिटीची स्थापना करण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जगदीश ईटी यांनी दिली.
ईटी पुढे म्हणाले, शहरातील प्रत्येक वॉर्डात 8 जणांची कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. या कमिटीत वार्डातील एक माजी नगरसेवक, तज्ञ असे चार नागरीक, पोलिस, अंगणवाडी सेविका व नगरपरिषदेचा कर्मचारी असे 8 जण असणार असून त्यांना आपल्या वॉर्डातील प्रत्येक नागरीकाला मास्क, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे करणे, वॉर्डातील संपूर्ण भागाची स्वच्छता राखणे, वॉर्डात ज्यांना होम क्वारंटाईन केले आहे, अशांचा औषधी कचरा संकलन करणे, प्रत्येक कुटूंबातील सदस्याची आरोग्य तपासणी करण्यासह ताप, सर्दी व इतर आजारवर वैद्याधिकाऱयांकडून उपचार करवून घेणे, कोरोनाविषयी जागृती करणे आदी कामे नेमून देण्यात येणार आहेत. प्रत्येक वॉर्डासाठी कमिटीची रचना झाली आहे. नागरिकांनीही या कमिटीला सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
या बैठकीला माजी उपनगराध्यक्ष आप्पासाहेब हेद्दूरशेट्टी, माजी नगराध्यक्ष संजय शिरकोळी, नगरसेवक संजय नष्टी, अजित करजगी, दिपक भिसे, दिनेश कोळेकर, नगरपरिषद परिसर अभियंता नारायण नाईक, आरोग्य अधिकारी प्रकाशगौडा पाटील, समुदाय आरोग्य केंद्राचे डॉ. दत्तात्रय दोडमनी, सिटीझन फोरमचे मुरली बडीगेर या मान्यवरांसह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी स्वयंसेविका व नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.