प्रतिनिधी/ संकेश्वर
गेल्या दोन दिवसापासून सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत किराणा बाजारपेठ खुली करण्यात आल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र दुपारी 12 नंतर प्रशासनाने कोणीही बाहेर पडणार नाही, याची खबरदारी घेताना सीलडाऊनची अंमलबजावणी कडकच करताना रस्त्यावर कोणी विनाकारण फिरताना आढळल्यास त्याला पोलिसांकडून प्रसाद देण्यात येत आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती ठीक असून आणखी क्वारंटाईनच्या आकडय़ात कोणतीही भर पडलेली नाही.
22 एप्रिल रोजी सुमारे 60 जणांना क्वारंटाईन केल्यानंतर गेल्या दोन दिवसात नव्या एकालाही क्वारंटाईन करण्यात आलेले नाही. शिवाय सर्व्हेच्या माध्यमातून संकलन झालेल्या माहितीच्या आधारे आरोग्य विभागाने योग्य ती काळजी घेतली आहे. तसेच आशा कार्यकर्त्यांकडून करडी नजर ठेवण्यात आली आहे. याबरोबरच पोलिसांकडून ड्रोनच्या सहाय्याने शहरातील कानाकोपऱयातील हालचाली टिपल्या जात आहेत.
संकेश्वरात आढळलेल्या कोरोनाबाधिताच्या प्रकृतीत सुधारणा असून त्याच्यावर देखरेखीत उपचार सुरू आहेत. दरम्यान गेल्या दोन दिवसात एकासही होमक्वारंटाईन केल्याची नोंद आढळली नसल्याने समाधान व्यक्त होत आहे. पोलीस, आरोग्य व नगरपरिषदेच्या कर्मचाऱयांनी खबरदारी घेताना सर्व यंत्रणा सतर्क केली आहे.