मुख्यमंत्र्यांकडे मागणी : संकेश्वर शहराचा समग्र विकास साधणार : सीमा हतनूरी यांची माहिती
प्रतिनिधी /संकेश्वर
गत पाच वर्षात संकेश्वर शहरात विविध विकासकामे सुरु आहेत. पण समग्र विकास साधण्यासाठी आणखी 20 कोटी रुपयांची गरज आहे. 20 कोटीतून करण्यात येणाऱया विकासकामाचा आराखडा मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना दिला आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी प्रस्ताव मंजूर करण्यास सहमती दर्शविली असल्याची माहिती नगराध्यक्षा सीमा हतनूरी यांनी मंगळवारी दिली.
संकेश्वर शहरातील जूने पुणे-बेंगळूर महामार्गाचे काँक्रीटीकरण करण्याचे काम चालू आहे. संपूर्ण शहर व विस्तारीत वसाहतीत 24 तास पाणी पुरवठय़ाची जलवाहिन्या जोडून पाणी पुरवठा केला जात आहे. विस्तारीत वसाहती व नव्याने निर्माण होत असलेल्या उपनगरात गटारी व रस्ते निर्माण केलेले नाहीत. शहरी भागातील रस्ते 24 तास पाणी योजनेत नळ जोडणीसाठी उखडले आहेत. त्यामुळे शहरी भागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. भुयारी गटार योजनेस मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने 16 कोटी मंजूर केले आहेत. पण त्यास अद्यापही तांत्रिक मंजुरी मिळालेली नाही. आठवडाभरात मंजुरी मिळणार आहे. मंजुरी मिळताच निविदा मागवण्यात येणार आहेत. शहर, नगर, उपनगरातील रस्ते, गटारी, डांबरीकरण, सीसीरोड, पेव्हरब्लॉक, सीसी गटार, एचडीपी जलवाहिनी जोडणी 20 कि.मी, दोन जलकुंभ, हायटेक उद्यान इत्यादी कामे नव्याने करण्यासाठी नगरपरिष्दोकडे निधीची कमतरता आहे. शहराच्या समग्र विकासासाठी कामांचा निश्चित आराखडा तयार करण्यात आला आहे. 20 कोटीचा प्रस्ताव मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची भेट घेऊन देण्यात आली आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी प्रस्तावाला मंजुरी देण्यास सकारात्मक दर्शविली असल्याचे यावेळी हतनूरी यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष अजित करजगी, स्थायी समिती सभापती सुनिल पर्वतराव, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक अमर नलवडे, संजय शिरकोळी, संजय नष्टी आदी मान्यवर उपस्थित होते.