श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजींची रथातून मिरवणूक
प्रतिनिधी/ संकेश्वर
शंकराचार्य संस्थान पीठाच्या रथोत्सवास रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. हर हर महादेवच्या जयघोषात बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत रथ पीठापासून नारायणेश्वर मंदिराकडे आणण्यात आला.
दुपारी 3 वाजता रथाची विधीवत पूजा करून सजविण्यात आलेल्या रथात श्री सच्चिदानंद अभिनव विद्या नरसिंह भारती स्वामीजी विराजमान झाल्यावर रथोत्सवास प्रारंभ झाला. सायंकाळी 5 च्या सुमारास बनशंकरी मंदिरापर्यंत पोहचला. यावेळी धार्मिक विधी होऊन प्रदक्षिणा झाल्यावर संस्थान मठाच्या भोई बांधवांनी मानाच्या पालखीतून स्वामीजींना परत मठाकडे नेले.
भव्य व दिव्य असलेला हा लाकडी रथ कापडी पताकांनी सजविण्यात आला होता. रथाला भगवे झेंडेही लावले होते. मिरवणूक विविध वाद्यांच्या गजरात शिव बजरंग नाद-नदी गल्ली व शिव स्वराज्य-मठ गल्ली या झांजपथकांनी उपस्थितांची मने जिंकली. यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मिरवणुकीत हिराशुगरचे चेअरमन आप्पासाहेब शिरकोळी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरे, गजानन क्वळ्ळी, डी. एन. कुलकर्णी, बसवराज बागलकोटी, अभिजीत कुरणकर, शंकरराव हेगडे, बसनगौडा पाटील, अशोक पाटील, पुष्पराज माने, प्रकाश नेसरी, कुनाल पाटील, महेश देसाई, आप्पासाहेब हेद्दूरशेट्टी, गिरीश कुलकर्णी, राजू काळेकर, जयप्रकाश सावंत, गणपती पाटील, राजू बांबरे, आप्पा पाटील, सुहास कुलकर्णी, राजू शिंदे, पालिका मुख्याधिकारी जगदीश ईटी, पीएसआय गणपती कोगनोळी आदी उपस्थित होते.