कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचे प्रतिपादन
कोल्हापूर प्रतिनिधी
संख्याशास्त्रांचा उपयोग समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर होत असतो. संख्याशास्त्राच्या अभ्यासक, संशोधकांनी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले. संख्याशास्त्र अधिविभाग व डीपार्टमेंड ऑफ रिसर्च सेंटच्या संयुक्त विद्ममाने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. शाहू स्मारक भवन येथील व्याख्यानाला विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व संख्याशास्त्र अभ्यासकांनी हजेरी लावली.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, 19 व्या शतकापासून ते समकालीनमध्ये संख्याशास्त्राच्या आधारे सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. फ्लोरेन्स नाईटिंगेल, पी. व्ही. सुखात्मे, एडवर्ड टेमिंग, सी. आर. राव आदींनी संख्याशास्त्रात भरीव योगदान दिले आहे. गरीबी कमी करण्यापासून ते दर्जा नियंत्रण, सुधारणा अशा प्रत्येक क्षेत्रात संख्याशास्त्राचा उपयोग होतो. सामाजिक भावनेतून संख्याशास्त्र विषयाकडे पाहिले पाहिजे. बदलत्या व्यवस्थेत एखाद्या विषयात ‘टॉप टू बॉटम’ सर्वांनी सहभाग नोंदवल्यास उत्तम निर्मिती होईल. कोणतीही व्यवस्था बदलण्यासाठी व्यवस्थापन महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने विचार मांडले तरच त्यांना आपण केलेल्या कामाचे समाधान मिळेल. एवढेच नव्हे तर योग्य मोबदलाही मिळेल. स्वागत डॉ. सोमनाथ पवार यांनी केले. प्रास्ताविक डॉ. एस. बी. महाडीक यांनी केले. संतोष सुतार यांनी आभार मानले. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क प्रमुख डॉ. अलोक जत्राटकर, किशोर खिलारे, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.