महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : पथदीप सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहराच्या विविध भागातील पथदीप बंद असून याबाबत सातत्याने तक्रार करूनही दखल घेण्यात येत नाही. एपीएमसी रोडचा विकास करण्यात आला. मात्र या मार्गावरील व संगमेश्वरनगर परिसरातील पथदीप बंद असल्याने स्मार्ट रोडवर अंधार पसरला आहे. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
एपीएमसी मार्केटयार्ड रोडचा विकास करून स्मार्ट रोड बनविण्यात आला आहे. पण या मार्गावरील निम्मे पथदीप बंद असल्याने संगमेश्वरनगर भागात अंधार पसरला आहे. मार्केट यार्डला ये-जा करणाऱया वाहनांची संख्या मोठय़ाप्रमाणात असून वर्दळीचा रस्ता असल्याने पथदिपांची आवश्यकता आहे. या ठिकाणी आझमनगर आणि बॉक्साईट रोड मिळत असल्याने चौक असून या चौकातील हायमास्टदेखील बंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर आणि चौकात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
अधिकाऱयांकडून कानाडोळा
या रस्त्यावरील पथदीप सुरू करण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने करण्यात आली. पण प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याबाबत येथील रहिवाशांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे तक्रार केली होती. पण मनपा अधिकाऱयांनी दखल घेतली नाही. तसेच येथील समाजसेवक प्रसाद चौगुले यांनी महापालिकेच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली होती. पण अधिकाऱयांनी कानाडोळा केला असल्याने पथदिपांची समस्या जैसे थे आहे.