एकाच दिवशी सापडले तब्बल 48 रूग्ण, देवरूख परिसरात प्रमाण अधिक
विशेष प्रतिनिधी/ देवरूख
आजपर्यंत तालुक्याच्या ग्रामीण भागात हळुवारपणे पसरत असलेला कोराना आता शहरी भागातही धुमाकुळ घालू लागला आहे. संगमेश्वर तालुक्यात कोरोनाने उद्रेक केला असून काल एकाच दिवशी तब्बल 48 पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. यातील देवरूख परिसरातील रूग्णांची संख्या सर्वाधिक असून पोलिस ठाण्यातही कोरानाचा शिरकाव झाल्याने देवरूख पोलिस ठाणे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
गुरूवारी संगमेश्वर तालुक्यातून 108 अहवाल तपासणीसाठी जिल्हा कोविड सेंटरमध्ये पाठवण्यात आले होते. यातील 48 अहवाल पॉझीटीव्ह आले असून 60 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे या 48 मध्ये 5 पेक्षा अधिक पोलिसांचा समावेश आहे. या सगळयांना तातडीने क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस ठाणे सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. या पॉझिटिव्ह पोलिसांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली जाणार असून यामध्ये वाढ होण्याची भिती व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉकडाउनपासून देवरूख शहर पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावली आहे. आत्तापर्यंत पोलिस ठाण्यातील एकही कर्मचारी कोरोनाग्रस्त नव्हता मात्र अचानक आलेल्या या संकटाने पोलिसदल हादरले आहे.
काल अहवाल आलेल्या पॉझीटीव्ह आकडयात सुमारे 30 अहवाल देवरूख परिसरातील आहेत. यामुळे आता देवरूखच्या वाडयावाडयांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 7 दिवस कडकडीत बंद ठेवूनही याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे दिवसागणीक रूग्ण वाढत असताना नागरिकांचा बेफ्ढिकीरपणाही तेवढाच वाढत असल्याने देवरूखातील हे संकट अधिकच गडद होण्याची भिती व्यक्त होत आहे. काल पॉझिटिव्ह आलेल्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सूरू असून त्यांचीही चाचणी होणार असल्याने देवरूखातील रूग्ण संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान नगरपंचायतीसह तालुका आरोग्य विभागानेही नागरिकांना घरीच राहून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
तालुक्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला. मुंबइतून आलेल्या काहींनी याची सुरूवात केली. त्यानंतरच्या काळात बरेच दिवस केवळ चाकरमानीच पॉझिटिव्ह निघत होते. स्थानिकांना याची लागण दिसत नव्हती आता मात्र स्थानिक पातळीवरच हा रोग वाढत निघाल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले सलग 10 दिवस तालुक्यात विशेषतः देवरूख परिसरात रूग्ण वाढण्याच्या घटना घडत आहेत. तालुक्यात आजवर 10 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे तर आत्तापर्यंतची रूग्णसंख्या 300 च्या वर गेली आहे. वाढत्या रूग्णसंख्येने आराग्य विभाग चिंतीत असून जागा अपुरी असल्याने अनेकांना होम क्वॉरंटाइन करून उपचार देण्याशिवाय कोणताही पर्याय आरोग्य विभागासमोर राहिला नसल्याचे चित्र आहे.
दरम्यान देवरूख पाठोपाठ आता संगमेश्वर बाजारपेठही पाच दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आरवली, तुरळ, कडवई या महत्वाच्या बाजारपेठाही पुढील काही दिवस बंद राहणार आहेत यामुळे तरी या कोरोनावर आळा बसेल का याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार आहे.