गोव्यातील प्रतिष्ठेचे संगीत समारोह साधारण नोव्हेंबर महिन्यापासून पुढे फेब्रुवारी मार्चपर्यंत जोमाने चालतात. सरकारकडून मिळणारे वार्षिक अनुदान किंवा नैमित्तिक अनुदान मार्च महिन्यात बंद होते. सरकारी अनुदानाशिवाय संगीत संमेलनाचे आयोजन म्हणजे तारेवरची कसरत जी सांस्कृतिक संस्थांना परवडण्यासारखी असत नाही. अनेक वर्षापासून काही संस्था संमेलने किंवा संगीत सभांचे आयोजन करतात. त्यामुळे एकाएकी संगीत समारोहाचा उपक्रम बंद करणे हेही संस्था चालकांना पटत नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणी केवळ उपचार म्हणूनही अशा संमेलनाचे आयोजन पहायला मिळते.
गोव्याच्या सांगीतिक इतिहासाकडे नजर फिरवल्यास ज्यावेळी गोव्यात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची हवा नव्हती, शास्त्रीय संगीताला पोषक वातावरण नव्हते. संगीत कलाकारांचा चरितार्थ संगीतावर चालणे शक्य नव्हते, संगीत शिकण्यासाठी योग्य गुरु नव्हते किंवा कसल्याही प्रकारचे साधन किंवा सुविधा गोव्यातील संगीताध्यायीना नव्हत्या, त्याकाळात संगीताची आराधना करण्यासाठी गोवा सोडून महाराष्ट्र किंवा देशातील इतर राज्यात जाऊन गोमंतकीयांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये लौकिक प्राप्त केला. युगप्रवर्तक स्व. पं. भास्कर बुवा बखले, गानयोगी स्व. पं. रामकृष्ण बुवा वझे, स्व. पं. जितेंद्र अभिषेकी, स्व. मा. दिनानाथ मंगेशकर किंवा कोणाही गोमंतकीय कलावंतांचा इतिहास पाहिल्यास संगीताच्या आराधनेसाठी त्यांनी उपसलेले कष्ट आणि भोगलेले दारिद्रय़ जाणून घेतल्यास अंगावर रोमांच दाटतात. गोव्याच्या सांगीतिक इतिहासामध्ये शेकडो नावे अशी आहेत जी आजच्या पिढीला माहितीसुद्धा नाही. पेशव्यांच्या दरबारात दरबारी गायिका आणि नृत्यांगना म्हणून गाजलेली मोहना पालकर किंवा संगीतासाठी देशभ्रमंती केलेले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले दिग्गज मुरारबा पेडणेकर हे कोण होते? याची पुसटशी कल्पनाही आजच्या संगीताध्यायीना नाही.
गोव्यात सुरुवातीच्या काळात जी संगीत संमेलने व्हायची त्यासाठी लोकांची तोबा गर्दी असायची. प्रशस्त मांडव, शेकडोच्या संख्येने खुर्च्या, मांडवाच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा कर्मचारी तैनात असायचे. तिकिट विक्रीचा काऊंटर त्याठिकाणी असायचा. सकाळी सुरु होणाऱया संगीताच्या मैफीली पहाटे पाच किंवा सकाळी सहा वाजेपर्यंत चालायच्या. दर्दी रसिक ‘व्वाह क्या बात है।’ म्हणून गाणाऱया किंवा वादन करणाऱया कलाकारांना हातवारे करून दाद द्यायचे. रसिकामध्ये दादक्रिया सोडली तर सर्वत्र शांतता असायची. तल्लीन होऊन श्रोते मैफलीचे श्रवण करायचे. सादरीकरण करणारे मुख्य गायक, वादक, साथीदार मनमुराद गायचे. दोन दोन तास मैफली सहज चालायच्या. दुरून येणारे श्रोते संमेलनस्थळी भाडय़ाच्या खोल्या घेऊन त्याठिकाणी मुक्काम ठोकायचे. काहीजण जवळपास राहणाऱया मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या घरी थांबायचे. ताजेतवाने होऊन पुन्हा संमेलनस्थळी जायचे. हे दिवस आता मागे पडले. तिकिट काढून संगीत ऐकायला आज कुणा रसिकाला गरज भासेल असे वाटत नाही.
आज संगीत शिकणाऱया मुलांची संख्या वाढलेली आहे. पालकांनाही आपली मुले संगीतासारख्या कलेच्या क्षेत्रात भवितव्य घडविण्यासाठी जातात हे बघून समाधान मिळते. गोवा संगीत महाविद्यालय, कला अकादमी, स्वामी विवेकानंद सोसायटी, कला आणि संस्कृती संचालनालय किंवा इतर अनेक खासगी संस्थांमधून संगीत विषयाचे अधिकृत शिक्षण घेण्याची सोय आहे. आज संगीत कलेद्वारे स्वतःचा चरितार्थ चालविणे सोपे आहे. संगीत विषयात माध्यमा, विशारद, कुशल, पारंगत, बी. म्युझिक, एम. म्युझिकचा अभ्यासक्रम केलेल्यांना विद्यालयामध्ये संगीत शिक्षक किंवा तत्सम क्षेत्रात शेकडोच्या संख्येने सरकारी नोकऱया मिळालेल्या आहेत. त्यामुळेही अनेकांना संगीतक्षेत्र सुरक्षित वाटते.
संगीताचा रियाज आणि संगीताचे रसग्रहण संगीताध्यायीसाठी अनिवार्य आहे. चांगले गाणे ऐकायलाच हवे असा नियमच संगीत शास्त्रामध्ये आहे. मात्र आज या नियमाकडे कुणी लक्ष देत नाहीत. संगीत संमेलनाच्या ठिकाणी कुणी फिरकत नाही. एखादाच संगीताचा विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचा गट संमेलनामधील मैफल ऐकण्यात स्वारस्य दाखवितो. संगीत क्षेत्रात वावरणारा प्रत्येक कलाकार हा शेवटपर्यंत विद्यार्थीच असतो. मात्र एकदा का नोकरी त्या क्षेत्रात मिळाली की बहुतेक कलाकारांची मानसिकता बदलते. केवळ चरितार्थापुरतेच संगीत अशी संगीताची व्याख्या ते बनवितात.
काही वर्षांपूर्वी कला अकादमीमध्ये केसरबाई केरकर संमेलनासाठी कला आणि संस्कृती खात्याशी जोडलेल्या सगळय़ा कलाकारांची उपस्थिती अनिवार्य केली होती. तिथे त्यांची हजेरी घेतली गेली. त्यांना नाश्ता, जेवणही पुरविण्यात आले होते. काणकोणपासून पेडणेपर्यंतचे सरकारी सेवेतील संगीत शिक्षक आणि कलाकार यांच्यामुळे केसरबाई संगीत संमेलनाला लक्षणीय उपस्थिती लाभली होती. मात्र मी त्या संदर्भात लिहिलेल्या लेखामुळे दोघेजण बरेच दुखावले होते. त्यांना वास्तव पचवता आले नव्हते. आज प्रत्येक संगीत संमेलनामध्ये कलाकारांना रसिकांची प्रतिक्षा असते. आयोजकांची तर श्रोत्यांची उणिव ही डोकेदुखीच असते. यावर्षी गिरीजाताई संगीत संमेलनाचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर यांनी संमेलनात उपस्थित राहणाऱया संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी समोरच्या तीन रांगा आरक्षित ठेवण्याचा निर्णय जाहीर केला म्हणूनच संगीताध्यायींची संगीत संमेलनाकडे पाठ का? हा विचार मनात आला आणि तो लिहावासा वाटला.
-दुर्गाकुमार श्रीकृष्ण नावती