ऑनलाईन टीम / पुणे :
संगीत हे शास्त्र, तंत्र, विद्या आणि कलेने बांधलेले आहे. शरीर, बुद्धी आणि मन या त्रिसंयोगातून संगीत विकसित होत असते आणि त्याचा प्रवास आत्म्यापर्यंत पोहोचत असतो. संगीत हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून तो आत्मरंजनाचा विषय आहे, असे मत पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.
गानवर्धन संस्थेतर्फे दिला जाणारा ‘स्वरगंधा’ सांगीतिक कुटुंब पुरस्कार यंदा तालयोगी पद्मश्री पं. सुरेश तळवलकर यांच्या कुटुंबाला प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना तळवलकर बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध गायिका पंडिता पद्मा तळवलकर, प्रसिद्ध गायिका सायली तळवलकर, नारायणराव टिळक, प्रख्यात गायिका आलापिनी जोशी, रमेश मराठे, गानवर्धन संस्थेचे संस्थापक कृ.गो. धर्माधिकारी, उपाध्यक्षा निलीमा राडकर, डॉ. राजश्री महाजनी आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपये 50 हजार रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावषीचा पुरस्कार पद्मश्री पं. सुरेश तळवलकर आणि पद्मा तळवलकर तसेच सत्यजित, सावनी, अनय आणि सायली या त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आला. तर सुप्रिया मसुरलकर पुरस्कृत प्रसन्नकुमार भदे स्मृति ताल साधना पुरस्कार श्रीकार्तिकस्वामी दहिफळे या उदयोन्मुख तबला वादकाला पंडित सुरेश तळवलकर देण्यात आला. पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
हा पुरस्कार कऱहाड येथील नारायण रघुनाथ टिळक यांनी पुरस्कृत केलेला असून कै. सौ. स्वरगंधा टिळक पूर्वाश्रमीच्या सरस्वती काळे यांच्या नावाने दिला जातो. सरस्वती काळे यांनी 1955 ते 1975 या वीस वर्षांच्या काळात सुगम-सिने नाट्यसंगीताचे सुमारे 6000 कार्यक्रम केले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या त्या विश्वस्त होत्या. तसेच ‘स्वरनिर्झर’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी संगीत शिक्षणाचे व्यापक कार्य केले आहे.
तळवलकर म्हणाले, रियाजामधून बाहेर पडून आता आम्ही साधनेच्या पातळीवर आलो आहोत आणि या पातळीवर रोजच परीक्षा असते. ती परीक्षा पास होण्याची प्रेरणा गुरु देतात. त्यामुळे असे पुरस्कार स्वीकारताना गुरूंची प्रकर्षाने आठवण येते. श्रोत्यांचे प्रेमपण महत्त्वाचे असते, तर गुरूंच्या कृपेने पुरस्कार मिळतात. गुरूंनी मला केवळ शिकवले नाही, तर त्यांनी आम्हाला नजर दिली. आम्हाला घडविले आणि हीच परंपरा मी पुढे नेत आहोत. करण संगीतक्षेत्रात घडविणे ही सूक्ष्म प्रक्रिया आहे, तर शिकवणे हे स्थूल आहे.
डॉ. बालाजी तांबे म्हणाले, आत्मशंतीसाठी संगीत हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असते. शरीर व्याधी दूर होऊन मनाला स्वस्थता लाभावी असा प्रयत्न होतो, मात्र हा प्रवास उलटा करत मी मनाच्या स्वास्थ्याच्या माध्यमातून शरीराचे स्वास्थ्य साधण्यासाठी संगीताचा वापर केला. मनाला आणि आत्म्याला संगीत रुपी औषध देऊन शरीर व्याधींवर नियंत्रण मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. यातून स्वास्थ्यसंगीत ही नवीन संकल्पना पुढे आली असून वैज्ञानिक आणि संगीत अभ्यासकांकडून त्याचा प्रचार प्रसार होऊ लागला आहे. यावर संशोधन सुरू आहे. जिथे ऊस औषध पोहोचू शकत नाही, ध्वनिलहरी यांच्या माध्यमातून संगीत पोहोचू शकते यावर माझा विश्वास आहे.