खानापूर तालुका म. ए. समितीची मागणी : शिवस्मारकात पत्रकार परिषद
प्रतिनिधी /खानापूर
सीमाभागातील घटक समित्यांमध्ये झालेल्या गटबाजीला सर्वस्वी मध्यवर्ती म. ए. समितीचे धोरणच कारणीभूत आहे. यापुढे सीमाभागात म. ए. समितीची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विद्यमान मध्यवर्ती म. ए. समिती बरखास्त करावी, व महाराष्ट्रातील समन्वयक मंत्र्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती म. ए. समितीची पुनर्रचना करावी, अशी मागणी खानापूर तालुका म. ए. समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांनी रविवारी खानापूरच्या शिवस्मारकात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत केली.
कुठल्याही निवडणुकीत उमेदवार निवडण्याचा अधिकार घटक समित्यानाच असतो. त्यानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीत खानापूर तालुका म. ए. समितीने विलास बेळगावकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण यानंतर मध्यवर्ती म. ए. समितीने अरविंद पाटील यांची उमेदवारी जाहीर करून खानापूर तालुका म. ए. समितीमध्ये गटबाजी निर्माण केली. मध्यवर्तीच्या धोरणामुळेच सीमाभागातील म. ए. समितीचे सर्व उमेदवार पराभूत झाले. यानंतर देखील घटक समित्यांमधील गटबाजी दूर करण्यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीने पूर्णतः दुर्लक्ष करून गटबाजीलाच खतपाणी घातले. यापुढील काळात होणाऱया निवडणुका व सर्वोच्च न्यायालयातील दाव्याचा पाठपुरावा होण्याच्या दृष्टीने मध्यवर्ती म. ए. समितीच्या पुनर्रचनेसाठी तातडीने पावले उचलावित, अशी त्यांनी मागणी केली.
यावेळी बोलताना कार्याध्यक्ष यशवंत बिरजे म्हणाले, खानापूर तालुका म. ए. समितीमधील गटबाजी विसरून दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी खानापूर तालुका म. ए. समितीने माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन समितीमधील ऐक्यासंदर्भात म. ए. समितीमधील दुसऱया गटाचे अध्यक्ष देवाप्पण्णा गुरव यांना लेखी प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये तुम्ही सांगाल त्या जागेवर व तुम्ही ज्यांची नावे देता त्यांना घेऊन एकत्रित बैठक होऊन गटबाजी संपवण्याचा लेखी प्रस्ताव देऊन दीड महिन्याचा काळ लोटला. पण अद्याप त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे देखील समजत नाही. आता यापुढे आम्ही वाट पाहणार नाही, त्याच गटाने म. ए. समितीमध्ये सहभागी होऊन तालुक्यात म. ए. समितीची संघटना मजबूत करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
ऐक्यासंदर्भात मध्यवर्तीकडे प्रस्ताव पाठवला होता का, असा सवाल यावेळी पत्रकारांनी केला. त्यावर उत्तर देताना म. ए. समितीचे उपाध्यक्ष विवेक गिरी म्हणाले, गेल्या सहा महिन्यापूर्वी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी सूर्य, चंद्र असेपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही, आम्ही सीमाभागातील म. ए. समितीच संपवणार आहे, असे जाहीर केले होते. त्यावेळी त्यांच्या पाठिमागे माजी आमदार अरविंद पाटील देखील उभे होते. पण त्यांनीही सवदींच्या या उत्तराला कोणताही आक्षेप घेतला नाही, आणि नकळत त्यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. यासंदर्भात आम्ही मध्यवर्ती म. ए. समितीकडे ठरावाद्वारे लेखी तक्रार करून अरविंद पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. पण मध्यवर्ती म. ए. समितीने कारवाई तर सोडाच, शिवाय आमच्या निवेदनाला साधे उत्तर देखील दिले नाही. त्या मध्यवर्ती म. ए. समितीकडून आम्ही कोणत्या अपेक्षा कराव्यात, असा सवाल केला. या पत्रकार परिषदेला सरचिटणीस आबासाहेब दळवी, मुरलीधर पाटील, प्रकाश चव्हाण, दीपक देसाई, बाळाराम शेलार, नारायण कापोलकर, लक्ष्मण कसर्लेकर, शिवाजी पाटील, नारायण पाटील यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते. शेवटी सरचिटणीस महादेव घाडी यांनी आभार मानले.
पराभूत उमेदवारांना घेऊन नव्या जोमाने कामाला लागणार
तालुका व शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय
म. ए. समिती ही सीमाप्रश्नाच्या चळवळीसाठी बांधलेली संघटना आहे. सीमाप्रश्नाला बळकटी यावी तसेच आपला आवाज महानगरपालिकेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने निवडणूक लढविण्यात आली होती. एका प्रभागात चार ते पाच मराठी भाषिक उमेदवार निवडणुकीला बसल्यामुळे समितीला पराभव पत्करावा लागला. परंतु निवडणुका हे आमचे अंतिम ध्येय नसून सीमाप्रश्नाची सोडवणूक ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे पराभूत उमेदवारांना घेऊन पुन्हा जोमाने कामाला लागण्याचा निर्णय तालुका व शहर म. ए. समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
रविवारी दुपारी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली. यावेळी महानगरपालिकेची निवडणूक शहर व ग्रामीण समितीची पुनर्रचना याविषयी चर्चा करण्यात आली. प्रारंभी शहर म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी प्रास्ताविक करून कार्यकर्त्यांना आपले विचार मांडण्याची सूचना केली. कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी आपले विचार मांडत ग्रामीण समिती पुनर्रचनेबाबत इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन केले.
विजयोत्सव साजरा करणाऱयांचा निषेध
बेळगाव महानगरपालिका म. ए. समितीच्या हातून भाजपच्या हाती गेली. याचा विजयोत्सव महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी साजरा केला. मराठी भाषिकांवर अन्याय सुरू आहे ही वस्तुस्थिती माहिती असतानाही विजयोत्सव साजरा झाला. तुम्हाला मदत करता येत नसेल तर आमच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका, असे राम भिंगुर्डे यांनी सुनावले. यावेळी गणेश दड्डीकर, मोतेश बार्देशकर, माजी नगरसेवक राजू बिर्जे, पियुष हावळ, मदन बामणे आदिंनी आपले विचार मांडले.यावेळी मध्यवर्तीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, तालुका म. ए. समितीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, रणजित चव्हाण पाटील, आर. आय. पाटील, युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व कार्यकर्ते उपस्थित होते.