प्रतिनिधी/ वडूज
खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वसामान्य शेतकरी, प्रमुख पदाधिकारी व प्रसारमाध्यमांनी संघटीत जनरेटा उभा केल्यामुळे उरमोडीचे पाणी तारळी कॅनॉलकडे वळविण्यास अधिकार्यांना भाग पडले.
याबाबतची अधिक माहिती अशी, तब्बल एक हजार 610 दहा कोटी निधी खर्च करुन तारळीचा प्रकल्प करण्यात आला आहे. या प्रकल्पातून धोंडेवाडी, मानेवाडी, तुपेवाडी, दातेवाडी, दगडवाडी, पळसगाव, कातरखटाव, सूर्याचीवाडी, पिंपरी, अनफळे, मोराळे, मायणी व मरडवाक या गावांचा शेती पाणीप्रश्न मिटणार आहे. या वर्षी शेतकर्यांनी पाण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांशी पत्रव्यवहार करून पैसे भरण्याची तयारी केली. याबाबत मार्च 2020 मध्ये वरीलपैकी बहुतांशी ग्रामपंचायतीने ठराव करुन संबंधित अधिकार्यांना पाठविले होते. मात्र, अधिकार्यांनी पुढील सूचनेअभावी हे पैसे भरायचे तरी कोठे? हा प्रश्न निर्माण झाल्याने पाणी शेतात खळाळले नाहीच. त्यास उरमोडी-तारळी प्रकल्पांचे अधिकारी व कालवा सल्लागार समिती ताळमेळ नसल्यामुळे पाणी मिळत नसल्याचा आरोप शेतकरी करत होते. संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विजय शिंदे, धोंडेवाडीचे सरपंच हणमंतराव भोसले यांनी आक्रमक होत कॅनॉलची मोडतोड करण्याबरोबर अधिकार्यांना फिरकू न देण्याचा इशारा दिला. याबाबत प्रसारमाध्यमे तसेच सोशल मिडीयावर जोरदार वादळ उठले होते. माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनीही मागील आठवडय़ात या विषयावर आवाज उठवला होता. तसेच एक जून रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी आंदोलन करण्याची तयारी दर्शविली होती. तर हरणाई सुतगिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी वरिष्ठ अधिकार्यांच्याकडे पाठपुरावा करण्याबरोबर थेट मंत्री जयंत पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. या सर्वाची गंभीर दखल घेत पाटबंधारे विभागाने तारळीच्या कॅनॉलमध्ये उरमोडीचे पाणी सोडले आहे. सोमवारी दुपारी सुटलेले पाणी बुधवार, गुरुवारपर्यंत पळसगांव, धोंडेवाडी पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या कॅनॉलला पाणी सुटल्याबद्दल लाभार्थी शेतकर्यांनी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी तसेच पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केलेल्या पदाधिकार्यांना धन्यवाद दिले आहे.