आझादी का अमृत महोत्सवांर्गत आयोजित विशेष व्याख्यानात आरएसएसचे डॉ. रविंद्र यांचे मत
प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्र आणि समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष करणाऱयांना एका जातीपुरते सीमित करणे योग्य नाही. विश्वगुरू बसवण्णा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सामाजिक समस्या सोडविल्या. आज आपण त्यांना एका जातीच्या चौकटीत बांधणे योग्य नाही, असे मत आरएसएसचे कर्नाटक उत्तरप्रांताचे सदस्य डॉ. रविंद्र यांनी व्यक्त केले.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या राज्य शास्त्र व संशोधन विभागातर्फे तसेच पत्रकारिता विभाग आणि विद्याभारती उच्च शिक्षण संस्था यांच्या सहकार्याने आझादी का अमृत महोत्सवांर्गत आयोजित विशेष व्याख्यानामध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलसचिव प्रा. बसवराज पद्मशाली होते.
डॉ. रविंद्र म्हणाले, मौर्य, विजयनगर, चालुक्मय व मराठा साम्राज्य अशा अनेक साम्राज्याच्या राज्यांनी भारतीय सनातन संस्कृतीचे रक्षण केले आहे. बाराव्या शतकात अनेक संत म्हणजेच पुरंदरदास, रामदास, कनकदास, ज्ञानेश्वर, शंकराचार्य, माध्वाचार्य यांनी अनेक सामाजिक सुधारणा करुन भारतीय संस्कृतीचे रक्षण केले आहे. प्रा. बसवराज पद्मशाली यांनी महात्म्यांचा त्याग आणि बलीदान यामुळेच भारताला स्वातंत्र्य मिळू शकले, असे सांगितले.
मूल्यमापन विभागाचे कुलसचिव विरनगौडा पाटील, प्रो. विनायक बंकापूर, राज्य शास्त्र विभागाचे प्रमुख वाय. एस. बलवंतगोळ, प्रा. एस. एम. भुरकडली आदी यावेळी उपस्थित होते.
विद्यार्थिनी गीता मल्लापुरे हिने स्वागतगीत म्हटले. डॉ. प्रकाश कट्टीमनी यांनी प्रास्ताविक केले. सुरेश ताकतराम यांनी स्वागत केले. सुरेश जंगोनी यांनी परिचय करुन दिला. डॉ. शिवू गोठे यांनी राष्ट्रगीत सादर केले. संपतकुमार यांनी सूत्रसंचालन केले. शिवप्पा पाटील यांनी आभार मानले.