रा. स्व. संघाच्या प्रतिनिधींची बैठक प्रथमच बेंगळूरमध्ये संपन्न
प्रतिनिधी/ बेंगळूर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी कर्नाटकातील दत्तात्रेय होसबाळे यांची निवड झाली आहे. बेंगळूरच्या चेन्नेहळ्ळी येथे सुरू असलेल्या दोन दिवसीय रा. स्व. संघाच्या प्रतिनिधींच्या वार्षिक सभेवेळी शनिवारी ही निवड करण्यात आली आहे. संघामधील हे दुसऱया क्रमांकाचे पद आहे. भय्याजी जोशी यांची ते जागा घेणार आहेत. भय्याजी यांना नवी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे मानले जात आहे. दत्तात्रेय यांची संघाच्या सरकार्यवाहपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
यंदा प्रथमच रा. स्व. संघाची अखिल भारतीय प्रतिनिधींची सभा नागपूरबाहेर भरविण्यात आली आहे. शुक्रवार आणि शनिवारी ही बैठक बेंगळूरमध्ये पार पडली आहे. मागील वर्षी होणारी ही बैठक कोरोनामुळे लांबणीवर टाकण्यात आली होती. शुक्रवारपासून दोन दिवस ही सभा बेंगळूरमध्ये झाली. शनिवारी संघाच्या सरकार्यवाह पदासाठी निवड झाली.
सरकार्यवाहपदी निवड झाल्यावर संघाशी निगडित व्यवहारिक आणि तात्विक विषयांवर निर्णय घेण्याची जबाबदारी होसबाळे यांच्यावर असेल. संघामध्ये सरकार्यवाहांची एक स्वतंत्र टीम काम करते, त्यांना केंद्रीय कार्यकारिणी म्हटले जाते.
भय्याजी जोशी यांच्याकडून घोषणा
रा. स्व. संघामध्ये 2009 पासून 12 वर्षे सरकार्यवाह पदाची धुरा सांभाळणारे भय्याजी जोशी यांनी नवे सरकार्यवाह पदावर दत्तात्रेय होसबप्ळे यांची निवड झाल्याचे ट्विट केले आहे. 65 वर्षीय दत्तात्रेय यांचे कुटुंब संघामध्ये सुरुवातीपासूनच सक्रीय आहे. 1978 मध्ये दत्तात्रेय यांनी पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम सुरू केले. त्यांनी आतापर्यंत संघाच्या विविध पदांची जबाबदारी सांभाळली आहे. सरकार्यवाह पद हे संघातील दुसऱया क्रमांकाचे उच्चपद आहे.
दत्तात्रेय होसबाळे मूळचे शिमोग्यातील
दत्तात्रेय होसबाळे हे मूळचे शिमोगा जिल्हय़ाच्या सोरब तालुक्यातील होसबाळे या गावचे आहेत. दत्ताजी म्हणूनच संघामध्ये त्यांची ओळख आहे. 1 डिसेंबर 1954 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शिमोगा जिल्हय़ातील सागर येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण बेंगळूरमधील नॅशनल कॉलेजमध्ये पूर्ण केले. तेथे एच. नरसिंहय्या यांच्यामुळे प्रभावित होऊन दत्तात्रेय यांनी 1968 मध्ये संघात प्रवेश केला. अभाविपचे सदस्य असताना 1972 मध्ये त्यांची निवड अभाविपच्या राष्ट्रीय संघटना सचिवपदावर वर्णी लागली. 15 वर्षे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी त्यांनी आंदोलने केली. 2004 मध्ये पुन्हा रा. स्व. संघात अधिक सक्रीय झाले. त्यांनी अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. नंतर सहसरकार्यवाह पदाची धुरा सांभाळली. आता ते सरकार्यवाह पदावर नियुक्त झाले आहेत.
राम माधवांची संघात वापसी
भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते राम माधव आता संघासाठी काम करणार आहेत. त्यांना भाजपमधून संघात परत बोलाविण्यात आले आहे. राम माधव यांना संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राम माधव यापूर्वी संघातून भाजपमध्ये महासचिव म्हणून गेले होते. त्यांनी काश्मीरसमवेत अन्य प्रकरणांमध्ये मोठी भूमिका बजावली होती. ते आता पुन्हा संघाच्या सेवाकार्यांमध्ये सामील होणार आहेत.
अनेक फेरबदल
याचबरोबर अरुण कुमार यांना प्रचारप्रमुखावरून सह सरकार्यवाहपद देण्यात आले आहे. रामलाल यांना अखिल भारतीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आलोक यांना अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख करण्यात आले आहे. तर सुनील आंबेडकर यांयान अखिल भारतीय प्रचारप्रमुख करण्यात आले आहे.