प्रतिनिधी / पणजी
राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत आता महाराष्ट्र – कर्नाटकाशी जोडून असलेल्या गोव्याच्या सीमांवर कडक तपासणी सुरू करण्यात आली आहे. कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र नसलेल्या लोकांना आणि त्यांच्या वाहनांना गोव्यात प्रवेश नाकारण्यात येत असून कामे नसताना किंवा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱया लोकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. राजधानी पणजीत तसेच प्रमुख शहरातील मार्केट बंद असल्याने ग्राहकांची भाजी, मासे, अंडी चिकन मटन यासाठी अडचण होत असल्याचे संचारबंदीतून समोर आले आहे.
राज्यात 15 दिवसांच्या संचारबंदीचा काल सोमवारी दुसरा दिवस होता. शहरात तसेच गावांनी सकाळच्या सत्रात अत्यावश्यक सामानाची दुकाने दुपारपर्यंत चालू असल्यामुळे तोपर्यंत लोक फिरकताना दिसत होते. त्यानंतर सायंकाळी मात्र सर्व रस्ते सुनेसुने होतात, असे हे संचारबंदीतील एकंदरीत चित्र झाले आहे.
बँका, औषधालये, अत्यावश्यक सामानाची दुकाने उघडी होती, बाकी सर्व दुकाने तसेच इतर आस्थापने बंद दिसून आली. सरकारी व खासगी कार्यालये सुरू असल्यामुळे त्यांना ये-जा करावी लागते म्हणून वाहने किरकोळ संख्येने होती. सायंकाळी 7 नंतर मात्र शहरातून शुकशुकाट दिसत असून सर्व दुकाने बंद असल्यामुळे सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसून येते. खासगी बसगाडय़ा पूर्णपणे बंदच असून गरजेच्या कामासाठी लोकांना आपापली वाहने घेऊन जावे लागत आहे, तर कदंबच्या अनेक बसगाडय़ा विविध मार्गावर चालू आहेत.
संचारबंदीला एकंदरीत जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी रेल्वेने येणाऱया प्रवाशांना मात्र मोकळे रान आहे. त्यांची चाचणी होत नाही आणि ते आरामात गोव्यात ये जा करीत आहेत.