पेडणेपासून काणकोणपर्यंत शुकशुकाट : सर्व रस्ते, चौक, बाजार पडले ओस दुपारनंतर सर्वत्र निरव शांतता
प्रतिनिधी / पणजी
उत्तर गोव्यातील पेडण्यापासून दक्षिण गोव्यातील काणकोणपर्यंत संपूर्ण गोवा राज्यात काल रविवारी सकाळी 9 वाजल्यापासून संचारबंदी सुरू झाली असून गोमंतकीय जनतेने त्यासाठी दिवसभर चांगला प्रतिसाद दिला आहे. अत्यावश्यक सामानाची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत उघडी होती आणि तेथे खरेदीसाठी लोकांची किरकोळ वर्दळ दिसून आली. दुपारनंतर मात्र सायंकाळी व रात्रीपर्यंत बहुतेक रस्यावर शुकशुकाट दिसून आला. शहरांतील तसेच गावांतील नेहमीची वर्दळीची तसेच गजबजलेली ठिकाणे निर्मनुष्य होती. होती. रस्त्यावर किरकोळ वाहने धावताना दिसत होती.
प्रमुख शहरातील तसेच गावातील मासळी व इतर मार्केट पूर्णपणे बंद होती. लोकांना मासळी, भाजी आवश्यक त्या प्रमाणात मिळाली नाही, अशा तक्रारी येत आहेत. चिकन, मटण विक्रीची दुकानेही बंद राहिल्याने त्याची चव अनेक ग्राहकांना चाखता आली नाही. शेवटी लोकांना अंडय़ावर भागवावे लागले. तर शाकाहारी लोकांनी भाजीशिवाय कसाबसा दिवस ढकलला.
पणजीत भाजी, फळविक्रेत्यांना हुसकावले
पणजी मार्केटमध्ये सकाळी अनेकजण भाजी, आंबे व इतर साहित्य विक्रीसाठी घेवून आले होते आणि ते मार्केटच्या बाहेर बसले होते. त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना काहीच मिळाले नाही. मासळी नाही, भाजी नाही त्यामुळे त्यांना आल्या पावली परत मागे फिरावे लागल.s प्रमुख मार्केटमध्ये मासळी न पोहोचल्याने तेथून ती अनेक गावातही जाऊ शकली नाही. रविवार असल्याने अनेकजण मासळीची वाट पहात होते. त्यांची शेवटी निराशा झाली. लोकांना इतर खाद्यपदार्थावर भागवावे लागले. भाजी व मासळीसाठी अनेकांवर वणवण फिरण्याची पाळी आली. परंतु त्यांना शेवटी तिचा लाभ झाला नाही.
आजपासून दिसणार कर्फ्युचा खरा परिणाम
काल रविवारी बहुतेक लोकांची सुटी असल्याने सर्वजण घरीच रहाणे पसंत करतात व फारसे फिरत नाहीत. त्यामुळे रविवारच्या दिवशी रस्त्यावर आणि इतर ठिकाणी गोव्यात सर्वत्र तशी वर्दळ कमीच असते. त्यामुळे संचारबंदीचा खरा परिणाम आज सोमवारपासून दिसणार आहे.
सार्वजनिक प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद
रविवारी खासगी बसवाहतूक पूर्णपणे बंद होती. कदंबच्या बसगाडय़ाही वाहतूक करताना दिसल्या नाहीत. बहुतेकांनी आपापली वैयक्तिक वाहने घेऊन कुठे गरज आहे तिकडे जाऊन रविवारचा दिवस ढकलला. आज सोमवारपासून सरकारी कार्यालये तसेच इतर उद्योग सुरू होणार असून तेथे हजेरी लावण्यासाठी कर्मचारी कामगारांना घरातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आज सोमवारपासून रस्त्यावर काही प्रमाणात वर्दळ वाढणार अशी चिन्हे आहेत. काल रविवारी पोलिसांनी फारशी नाकाबंदी कुठे केल्याचे आढळले नाही. काही ठिकाणी पोलीस होते परंतु फारशी तपासणी त्यांनी केली नाही. मास्क वापरत नसलेल्यांना दंड देण्यात येत होता.
इस्पितळे, फार्मसी, लसीकरण सुरु
अत्यावश्यक साहित्याची दुकाने सोडली तर इतर सर्व दुकाने-अस्थापने बंद होती. पेट्रोल पंप, मेडीकल शॉप, सरकारी-खासगी इस्पितळे चालू होती. तसेच लसीकरण केंद्रातही अनेकजण लस घेण्यासाठी जाताना दिसत होते. समुद्रकिनारे, रस्ते हे सुनेसुने दिसत असून तेथे सन्नाटा पसरला होता. रात्रीच्यावेळी तर भयाण शांतता जाणवत होती. मध्येच एकादे दुसरे वाहन ये-जा करताना दिसत होते. पुढील 15 दिवस हे असेच चित्र रहाणार अशी चित्रे दिसत आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी वाहनचालकांची चौकशी करून त्यांना सोडून दिले.
मृत्यूदर आठ-दहा दिवसांत कमी होणार : मुख्यमंत्री : कंत्राटी डॉक्टर्स, नर्स, कर्मचाऱयांना प्राधान्य देणार
गोव्यातील कोरोनाबाधित रूग्णांचा वाढलेला मृत्यूदर येत्या 8 ते 10 दिवसात नियंत्रणात येऊन कमी होईल, अशी आशा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रकट केली आहे. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडीयम व सुपर स्पेशालिटी विभाग (हॉस्पिटल) पहाणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, कोरोना रूग्णांना सर्व आरोग्य सेवा-सुविधा पुरवण्यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करीत असून स्टेपअप हॉस्पिटल तालुकावार सुरू करण्याची तयारी चालवली आहे. कोरोना संकट काळात काम करणाऱया डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचारी (सर्व कंत्राटी) यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे ते म्हणाले.