कागल/प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याची कडक अंमलबजावणी सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र – कर्नाटक सीमाभागात म्हणजेच कोगनोळी टोल नाक्यावर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. नाक्यावर आलेली वाहने आल्या मार्गाने परत पाठवली जात आहेत. मात्र यामुळे वाहनचालकांची व प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. त्याचा गैरफायदा काही लोकांकडून घेण्यात येत असल्याची चर्चा आहे. कर्नाटकातून महाराष्ट्र हद्दीत कागलमध्ये सोडण्यासाठी तब्बल दोन हजार रुपयांची मागणी होत आहे. हे पैसे दिल्यावरच हंचनाळमार्गे महाराष्ट्रात कागल जवळ अशा प्रवाशांच्या वाहनांना आणून सोडले जात आहेत.
सध्या देशावर कोरोनाचे संकट आले आहे. अनेक नागरीक कामानिमित, पर्यटनानिमित्त, प्रवासाच्या निमिताने बाहेरच्या राज्यात आहेत. त्यांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ आहे. पुण्या-मुंबईकडून बेळगाव, धारवाड, बेंगलोरकडे तसेच बेळगाव, बेंगलोर व धारवाडकडून पुण्या मुंबईकडे, राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.
देशभर संचारबंदी लागू असल्याने अशा लोकांची मोठी कुचंबना होत आहे. कोगनोळी टोलनाक्यावर कर्नाटक व महाराष्ट्र सरकारकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. टोलनाक्याला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवेश करण्यासाठी अनेक लोक खाजगी वाहनाने कोगनोळी टोल नाक्यापर्यंत येत आहेत. परंतु बंदोबस्त कडक असल्यामुळे या वाहनांना परत जाण्याच्या सूचना पोलिसांच्या कडून देण्यात येत आहेत. प्रवाशांच्या या अडचणीचा काही जण गैरफायदा घेत असल्याची चर्चा आहे.
अडचणीत आलेल्या प्रवाशांना महाराष्ट्रात सोडतो असे सांगून त्यासाठी दोन हजार रुपये मागणी केली जात आहे. काही लोकांनी हा धंदाच सुरू केल्याची चर्चा आहे. रात्रीच्या वेळा ही वाहने कोगनोळीवरून हंचनाळ मार्गे कागल कडे घेऊन यायची व कागलमध्ये महामार्ग सोडायचे यासाठी अगोदरच दोन हजार रुपये ताब्यात घ्यायचे हा फंडा सुरू आहे. यासाठी मध्यरात्रीची वेळ निवडण्यात येते. अशाप्रकारे प्रवाशांची लूट होत आहे. कागल पालिकेचे कर्मचाऱ्यांचे एक तपासणी पथक येथील सांगाव नाका परिसरात चोवीस तास तैनात करण्यात आले. या पथकाला हा प्रकार लक्षात आला आहे. कोणत्याही तपासणीविना येणाऱ्या या वाहनांचा त्रास कागलला होत आहे.