कोल्हापूर, सांगली, पुण्याला जाऊन आल्याचे उघड
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सर्वसामान्य नागरिक संचारबंदीचे पालन करीत असताना जि. प. च्या अधिकाऱयांकडून संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे. संचारबंदी मोडत जिल्हय़ाबाहेर गेलेल्या दोन अधिकारी व एका कर्मचाऱयाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी कारवाईची नोटीस बजावत परवानगीशिवाय कुणीही मुख्यालय सोडू नये, असे आदेश काढण्यात आले आहेत.
दरम्यान आणखी दोन अधिकारीही संचारबंदी मोडत जिल्हय़ाबाहेर गेल्याची माहिती मिळाल्याने त्याची चौकशी सुरू आहे. तर जिल्हय़ाबाहेर गेलेले हे अधिकारी कोल्हापूर, सांगली, पुणे या हायरिक्स असलेल्या जिल्हय़ात जाऊन आल्याचीही धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 3 मेपर्यंत संचारबंदी लागू आहे. त्यामुळे जिल्हय़ाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा देणाऱया व्यक्तींव्यतिरिक्त कोणालाच प्रवेश नाही किंवा जाण्यास परवानगी नाही. असे असतानाही काही अधिकारी जिल्हय़ाबाहेर गेले कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य नागरिक संचारबंदी पाळत असतील, तर अधिकारी का पाळत नाही? असा सवाल उपस्थित करीत काही लोकांनी आवाज उठवताच संचारबंदीचे उल्लघंन करणाऱयावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी, यांत्रिकी विभागाचे अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱयांचे स्विय्य सहाय्यक या तिघांना कारवाईच्या नोटिसा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी बजावल्या आहेत. तिघेही जिल्हय़ाबाहेर गेले होते, तर लघु पाटबंधारे विभागाचे दोन अधिकारीही जिल्हय़ाबाहेर जाऊन आल्याची माहिती उपलब्ध झाली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनी दिले आहेत.