प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर कोरोनामुळे देशभरामध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीला चाळीस दिवस लोटले आहेत. कोल्हापुरातील नागरिकांच्या सोयीसाठी २० एप्रिलपासून बऱ्यापैकी संचारबंदी शिथिल केली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांपासून वाहने रस्त्यावर येत असल्यामुळे अपघात टाळण्याच्या उद्देशाने मुख्य रस्त्यावर लावलेली बॅरिकेटस् गुरुवारी काढण्यात आली.
कोरोना या संसर्गजन्य आजाराने जगभरामध्ये थैमान घातले आहे. याचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरामध्ये २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू पाळण्यात आला. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली. देशवासियांनी संचारबंदीचे काटेकोर पालन केले आहे. मात्र हातावरचे पोट असणाऱ्या घटकांचे हाल होत आहेत. देशभरात सर्वांची अर्थिक कोंडी झाल्यामुळे प्रशासनाने आपल्या पातळीवर काही ठिकाणी संचारबंदीमध्ये शिथिलता आणली. परिणामी रस्त्यावर नागरिक, वाहनांचे प्रमाण वाढले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रोजगार आणि कामानिमित्त अनेक जण रस्त्यावर येत आहेत. अशावेळी रस्त्यांवरील अडथळ्यांमुळे नागरिकांना नाहक अडचणी येऊ नयेत तसेच मुख्य रस्त्यावर लावलेली बॅरिकेटस वाहनधारकांच्या अपघाताला कारणीभूत ठरू नयेत या उद्देशाने कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने गुरुवारी दिवसभर बॅरिकेट्स हटवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे गेल्या ४० दिवसापासून बंद केलेले रस्ते पूर्ववत सुरू झाले. गेल्या ४ दिवसांपासून रस्त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. गुरुवारी बैरिकेटस् हटाविल्यानंतर वाहनांची रस्त्यावर येण्याची संख्या वाढली होती.