वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार निवडणुकीतील संयुक्त जनता दलाची कामगिरी पाहता पक्षात सातत्याने मंथन सुरू असून आवश्यक बदलही केले जात आहेत. यापूर्वी संजदच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आरसीपी सिंग यांना सोपविण्यात आली होती. तर संजद प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत नवा प्रदेशाध्यक्ष निवडण्यात आला आहे. संजद नेतृत्वाने उमेश कुशवाह यांना ही जबाबदारी सोपविली आहे.
सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नितीश कुमार आता पुन्हा राजकीय दृष्टय़ा सक्रीय झाले आहेत. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तुलनेत कमी जागा मिळाल्यावर संजदला बळकटी देण्यासाठी त्यांनी अनेक पावले उचलली आहेत. नितीश यांच्या पक्षाला लव-कुश म्हणजेच कुर्मी-कोइरी-कुशवाहांचा पक्ष मानले जाते. याच जाती संजदची मुख्य मतपेढी असल्याचे मानण्यात येते. विधानसभा निवडणुकीत 43 जागा जिंकणाऱया संजदचे माजी अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री नितीश यांनी पुन्हा लव-कुश समीकरण मजबूत करण्याचे प्रयत्न आरंभिले आहेत.
लव-कुश समीकरण
याच समीकरणाच्या अंर्गत नितीश यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत लव म्हणजेच कुर्मी समाजाशी संबंधित रामचंद्र प्रसाद सिंग (आरसीपी सिंग) यांना पक्षाचे अध्यक्षपद सोपविले आहे. तर आता उमेश कुशवाह यांना प्रदेशाध्यक्षपद देत नितीश यांनी जातीय समीकरणे साधण्याची कसरत केली आहे.
मित्र कोण, शत्रू कोण कळलंच नाही
निवडणुकीवेळी आमचा मित्र कोण आणि शत्रू कोण हे कळलेच नाही असे उद्गार नितीश यांनी संजदच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला संबोधित करताना काढले होते. राजकीय वर्तुळात यासंबंधी आता कयास वर्तविले जात आहेत. नितीश यांनी हे विधान भाजपला उद्देशून केल्याचे मानले जाते. पक्षाच्या बैठकीत संजदच्या पराभूत उमेदवारांनी लोकजनशक्ती पक्षामुळे नव्हे तर भाजपमुळे फटका बसल्याचे म्हटले होते.