ऑनलाईन टीम/तरुण भारत
केंद्रीय यंत्रणांकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची चौक्षु केली जात असून पुरावे देऊनही भाजपच्या नेत्यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चांगलंच चर्चेत आलं आहे. दरम्यान आता संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालयात धाव घेऊन गैरव्यवहाराचे पुरावे सादर केले आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांची चौकशी होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय राऊतांनीही शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन उलट किरीट सोमय्यांवरच आरोप केले. या सगळ्या प्रकारामुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं होतं. आता या सगळ्याचा पुढचा अंक सुरू झाला असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान कार्यालय गाठलं आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहारांचे पुरावे सादर केले असून त्यासंदर्भात लवकरच मुंबईत पत्रकार परिषद घेणार असल्याचं राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊतांनी पंतप्रधान कार्यालयाकडे गैरव्यवहाराचे पुरावे असलेले कागदपत्र सोपवल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. “केंद्र सरकारकडून कारवाईची अपेक्षा नाही. कारण केंद्रातल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशांनुसार महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये या सूडाच्या कारवाया सुरू आहेत. महाराष्ट्रात जास्त. जणूकाही केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात फक्त महाराष्ट्रातच काम आहे. महाराष्ट्रातच सर्वकाही घडतंय. महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचं. खोटी प्रकरणं, खोटे पुरावे उभे करायचे. अशी चिखलफेक सुरू आहे. पण जे चिखल फेकत आहेत, त्यांचे हात देखील किती बरबटलेले आहेत हेसुद्धा देशाला कळायला हवं”, असं राऊत म्हणाले.