ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
गेल्या काही दिवसात तृणमुल काँग्रेलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी अनेक राज्यांचे दौरे केले. महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांचे दौरे केले. या दौऱ्याचा उद्देश युपीए संदर्भात पुन्हा चाचपणी हाच असल्याचे ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवास्थानी झालेल्या बैठकीत माध्यमांशी बोलताना याबद्दल थेट भाष्य केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर कोणत्याच आघाडीचा घटक नसलेला शिवसेना हा पक्ष लवकरच संयुक्त पुरोगामी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची उद्या दि. ७ डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत. या बैठकीबाबत राजकिय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या बैठकीत संजय राऊत हे शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची यूपीएबाबत नेमकी भूमिका काय आहे, हे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना सांगतील, असे म्हटले जात आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयामुळे देशाच्या राजकारणात मोठे बदल होणार का ? याबाबत ही चर्चा रंगू लागल्या आहेत.