ऑनलाईन टीम / मुंबई :
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वादात सापडलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आजच (दि. 4 मार्च) दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते. त्यानंतर राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. अशी माहिती राजभवनातून देण्यात आली. आता वनमंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू झाली असून अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत.
दरम्यान, राजीनामा देण्याआधी पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर राजीनाम्याचा स्वीकार करावा अशी विनंती संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपले मंत्रिपद टिकावे म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते. मात्र, संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठा दबाव होता. या प्रकरणावरुन शिवसेना आणि महाविकास आघाडीवर टीकेची झोड उडवली जात होती.