वृत्तसंस्था / दुबई
येथे झालेल्या आशियाई मुष्टीयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संजीतने कझाकस्तानच्या लेव्हिटचा पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. मात्र या स्पर्धेतील विद्यमान विजेता अमित पांघल आणि शिवा थापा यांना आपल्या वजनगटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरूषांच्या 91 किलो वजनगटातील अंतिम लढतीत भारताच्या संजीतने कझाकस्तानच्या ऑलिंपिक पदक विजेत्या व्हॅसेली लेव्हिटचा 4-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय स्पर्धकांची या स्पर्धेतील कामगिरी दर्जेदार झाली आहे. 2019 च्या आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेच्या तुलनेत यावेळी भारतीय स्पर्धकांनी 15 पदकांची कमाई केली. गेल्या आशियाई स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदकासह 13 पदके मिळविली होती. यावेळी भारताने दोन सुवर्णपदकांसह 15 पदके मिळविली आहेत.
पुरूषांच्या 52 किलो वजनगटात उझ्बेकच्या झोइरोव्हने अमित पांघलला अंतिम लढतीत 3-2 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. 2019 च्या स्पर्धेत 52 किलो वजनगटात पांगलने झोइरोव्हचा पराभव करून सुवर्णपदक मिळविले होते. अमितने या स्पर्धेत मिळविलेले रौप्यपदक प्रशिक्षक अनिल धनकरला समर्पित केले आहे. पुरूषांच्या 64 किलो वजनगटात मंगोलियाच्या चिनझोरिगने भारताच्या शिवा थापाचा अंतिम लढतीत 3-2 असा पराभव केला. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल अखिल भारतीय मुष्टीयुद्ध फेडरेशनचे अध्यक्ष अजय सिंग यांनी समाधान व्यक्त केले आहे. या स्पर्धेतील चांगल्या कामगिरीमुळे भारतीय मुष्टीयोद्धय़ांचा आता आगामी टोकियो ऑलिंपिकसाठी अधिक आत्मविश्वास वाढला आहे. या स्पर्धेत सोमवारी महिलांच्या 75 किलो वजनगटात भारताच्या पूजा रानीने सुवर्णपदक पटकाविले. तसेच सहावेळा विश्वविजेतेपद मिळविणारी भारताची एम.सी मेरी कोम (51 किलो), 64 किलो गटात प्रथमच भाग घेणारी लालबुआत्सेही (64 किलो) आणि अनुपमा (81 किलोवरील गट) यांनी रौप्यपदके मिळविली. भारताच्या सिमरनजीत कौर (60 किलो), विकास कृष्णन (69 किलो), बी.लवलिना (69 किलो), जस्मीन (57 किलो), साक्षी चौधरी (64 किलो), मोनिका (48 किलो), सवीती (81 किलो) आणि वरिंदर सिंग (60 किलो) यांनी कांस्यपदके मिळविली.