बहुतांश राज्यात पूरस्थिती : राजस्थानमध्ये रेड-ऑरेंज अलर्ट : यमुना नदी तुडूंब
नवी दिल्ली, जयपूर / वृत्तसंस्था
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यमुनेसह अनेक नद्या तुडूंब भरून वाहत आहेत. साहजिकच काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांना सर्वाधिक फटका बसला असून जीवितहानीबरोबरच मोठय़ा प्रमाणात वित्तहानीही झाली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंडमध्ये संततधार पाऊस सुरू आहे. राजस्थानमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
उत्तर भारतात आता मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्यानंतर संततधार पाऊस कोसळू लागला आहे. गेल्या दोन दिवसात विविध भागात ढगफुटीही झाली आहे. या ढगफुटीत 20 हून अधिक बळी गेले असून अजूनही 30 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. ढगफुटीनंतर निर्माण झालेली बिकट परिस्थिती सामान्य करण्यासाठी केंद्रीय मदत व बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.
राजस्थानमधील नागौर, सिकर आणि अजमेर जिल्हय़ात बुधवारपासून पाऊस वाढला असून पुढील तीन दिवस हे प्रमाण वाढत जाईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. जयपूर, झुंझुनू, टोंक, कोटा, भिलवाडा, बरन, चुरु आणि झलवार जिल्हय़ात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ढोलपूर जिल्हय़ातील बरी, राजखेडा आणि बसेरी भागात गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे.