शहरातील सखल भागामध्ये पुन्हा पाणी साचले : बळीराजाला दिलासा, शेतीची कामे खोळंबली
प्रतिनिधी/ बेळगाव
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर निसर्ग वादळ कोकणामध्ये धडकले. त्याचा परिणाम बेळगाववरही दिसून आला. बुधवारी सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शहरातील सखल भागामध्ये पुन्हा पाणी साचले. त्यामधून वाट काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली. संततधार पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारठा निर्माण झाला होता.
गेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन झाले. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरून तारांबळ उडाली होती. त्यानंतर सलग तीन दिवस पाऊस सुरूच आहे. मान्सूनपूर्व पाऊस दमदार झाल्याने बळीराजा मात्र सुखावला आहे.
बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे गांधीनगर, बी. एस. येडियुराप्पा मार्गावर पाणी साचून होते. गांधीनगर येथील भुयारी मार्गामध्ये नेहमीच पाणी साचत असते. बुधवारी झालेल्या दमदार पावसानंतर कंबरभर पाणी साचून होते. त्यामधून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागली. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाने गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावरून वाहत होते. कोरोनामुळे तोंडाला मास्क व पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी रेनकोट आणि छत्रीचा आधार घेताना नागरिक दिसत होते.
व्यापाऱयांची उडाली तारांबळ
संततधार पावसामुळे फेरीवाले, भाजी विपेते आणि बैठय़ा व्यापाऱयांची धावपळ झाली. खरेदीसाठी नागरिकांना पाण्यातून वाट काढत तसेच भिजतच खरेदी करावी लागत होती. काही जण पाऊस कमी होईल म्हणून विनाछत्रीच बाजारात दाखल झाले होते. मात्र, पाऊस सतत सुरू असल्यामुळे त्यांना चांगलाच फटका बसला. गटारींतील पाणी रस्त्यांवर आल्यामुळे सर्वत्र कचरा पसरला होता. मंगळवारी रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. बुधवारी सकाळी मात्र पावसाचा जोर वाढला होता. या दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे शहरातील रस्त्यांची आणि नाल्यांची जी अवस्था झाली आहे ती पाहता पुन्हा यावषीही महापुराचा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे ते रस्ते उखडून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. फुटपाथवरही पाणी साचल्याचे दिसून येत होते. बी. एस. येडियुराप्पा मार्गावर गटार अर्धवट असल्यामुळे तेथे सर्व पाणी रस्त्यावरच साचत असल्यामुळे रस्ता खराब होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भाजीपाला-इतर पिकांना फटका बसण्याची भीती
या पावसामुळे धूळवाफ पेरणी केलेल्या शेतकऱयांना फायदा झाला असला तरी आता पावसाने विश्रांती घेण्याची नितांत गरज निर्माण झाल्याचे शेतकऱयांतून बोलले जात आहे. कारण अधिक पाऊस झाला तर पेरणी केलेले भात बियाणे वाया जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर भाजीपाला व इतर पिकांनाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. पाऊस हवा आहे मात्र पूर नको, अन्यथा पुन्हा दुबार पेरणीचे संकट शेतकऱयांसमोर उभे राहणार आहे. काही भागातील शेतकऱयांनी मशागत अर्धवट केली आहे. त्यामुळे मशागत करण्यासाठी जमिनीतील पाणी कमी होणे गरजेचे आहे. अन्यथा, मशागत करणेही कठीण जाणार आहे.
मागीलवषी महापुरामुळे बांध फुटले होते. यावषी शेतकऱयांनी उन्हाळय़ामध्ये त्या बांधांची बांधणी केली आहे. मात्र, आता अधिक पाऊस झाला तर शिवारामध्ये पाणी तुंबून पुन्हा बांध फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. या पावसामुळे विहिरी, नाल्यांना काही प्रमाणात पाणी आले आहे.
स्मार्ट सिटीच्या कामांचा बोजवारा
शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाल्यानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत विविध रस्त्यांचे, पदपथांचे तसेच इतर कामे हाती घेण्यात आली होती. मात्र, ही सर्व कामे संथगतीने सुरू आहेत. या कामांसाठी अनेक ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. याचबरोबर काही ठिकाणी कामे अर्धवट झाली आहेत. या पावसामुळे स्मार्ट सिटीच्या कामांचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. वाहतुकीला अनेक ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. गेल्या वर्षभरापासून अनेक रस्ते खोदाई करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
भर पावसात रस्त्यांची अवस्था काय होईल?
आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. अजून मान्सूनचे आगमन होणे याचबरोबर इतर दमदार पाऊस होणे बाकी आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे भर पावसात या रस्त्यांची अवस्था काय होईल, याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशीच अवस्था राहिल्यास शहरातील अनेक रस्त्यांवर वाहन चालविणे कठीण होणार असल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.