हवामान बदलाचा शेतकऱयांना फटका
वार्ताहर/ एकसंबा
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पहावयास मिळत आहे. याचा फटका मात्र शेतकऱयांना सोसावा लागत आहे. चार दिवसापासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने पिकांमध्ये पाणी साचून राहिले आहे. यामुळे याचा उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सध्या सोयाबीनची रास असो वा काढणीसाठी आलेले भुईमूग पाणी साचल्याने वाया जाण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे. वातावरणातील बदलाचा व शनिवारीही पुन्हा पाऊस बसरसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभापासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. पण 5 दिवसापूर्वी वातावरणात बदल झाला व पावसाच्या सरी कोसळल्या. 5 दिवसात दोन मोठे पाऊस पडल्याने शेतकऱयांची झोपच उडाली आहे. काहींनी सोयाबीनची रास केली आहे तर काहींची पावसामुळे रखडली आहे. भुईमुगाचीही अवस्था तशीच आहे. सततच्या पावसाने भुईमूग पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी शेतात घात येण्याची वाट पहात आहे. पण पावसामुळे पाणी साचल्याने चिंता वाढली आहे.
पिकांची रास करण्यासाठी व भुईमूग काढण्यासाठी शेतकऱयांनी शेतमजूर देखील सांगितले आहेत. पण शेतात खूप पाणी असल्याने मजुरांचे कामही बंद झाले आहे. जुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाच्या संततधरेमुळे शेतीची कामे बंद होती. दोन महिन्यानंतर सप्टेंबर महिन्यात थोडे फार काम येत होते. शेतीकामातून मिळणारा पैसा घर कामासाठी आर्थिक पाठबळ देणारा होता. पण अचानक हवामान बदलातील पावसामुळे शेतकऱयांसह मजुरांचेही गणित बिघडले आहे. पाणी पूर्णपणे ओसरण्यास पाऊस थांबल्यानंतरही 4-5 दिवसाचा कालावधी लागणार आहे.
ओढे-नाले तुडूंब
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणारा पाऊस सायंकाळी किवा रात्री पडत होता. पण आता सकाळपासूनच पावसाचे वातावरण तयार होत असल्याने आणखीनच चिंतेत भर पडली आहे. या पावसामुळे कॅनॉल, ओढय़ांमध्ये पाणी वाहत आहे. तसेच ऑगस्ट महिन्यात पुरामुळे नाश झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात येत आहेत. पण या पावसामुळे पंचनामे करताना व्यत्यय येत आहे.