महालक्ष्मी यात्रा कमिटी – गावकऱयांनी स्वखर्चाने-श्रमदानातून रस्त्यातील मोठे खड्डे बुजविले
प्रतिनिधी /बेळगाव
संतीबस्तवाड ते तिर्थकुंडये (ता. खानापूर) या रस्त्याची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरून प्रवास करताना शेतकरी व सर्वसामान्य जनतेला कसरत करावी लागत आहे. या रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेल्या 70 वर्षापासून संतीबस्तवाड येथील तिर्थकुंडये या रस्त्याकडे कोणीच पाहिले नाही. खडकाळ व मोठमोठे खड्डे यांना पार करून नागरिक व शेतकऱयांना प्रवास करावा लागतो. पुढील महिन्यात तिर्थकुंडे गावाची महालक्ष्मी यात्रा होणार असून, यावेळी तरी या रस्त्याची समस्या सोडवावी. त्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी तिर्थकुंडये ग्रामस्थांकडून होत आहे.
या रस्त्याची दुरवस्था पाहून तिर्थकुंडये महालक्ष्मी यात्रा कमिटी व गावकरी यांनी स्वखर्चाने व श्रमदानाने रस्त्यातील मोठे खड्डे बुजविण्यात आले. तरीपण स्थानिक लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन संतीबस्तवाड ते तिर्थकुंडये हा 4 कि. मी. चा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून सहकार्य करावे, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष किशोर देशपांडे, उपाध्यक्ष बाळू मुत्येनट्टी, लक्ष्मण तारिहाळकर, कृष्णा बिरंजे, महादेव खामकर, निंगाप्पा बस्तवाडकर, विष्णू मोरे, गुंडू जांबोटी, प्रकाश मजगावी, बाबू लोकोळी, वैजू संजमनी, फकिरा नावगेकर व रामलिंग देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.